कीटकनाशक विषबाधितांचे मृत्यू आरोग्ययंत्रणेने दडवले?
कीटकनाशक विषबाधितांचे मृत्यू आरोग्ययंत्रणेने दडवले?

कीटकनाशक विषबाधितांचे मृत्यू आरोग्ययंत्रणेने दडवले?

आमच्याकडून नियमित अहवालाद्वारे माहिती दिली जात आहे. या संदर्भाने होणारे आरोप तथ्यहीन आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तहसीलदार दर्जाचा अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून नियुक्‍त केला आहे. त्यांना दररोज माहिती पुरवली जाते. फवारणीदरम्यान विषबाधितांवर उपचारासाठी आमच्याकडे आधुनिक यंत्रणा कार्यान्वित आहे. कृत्रिम श्‍वासोच्छवास यंत्रणादेखील पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहे. - डॉ. राजेश कार्यकर्ते, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला.

नागपूर   ः अकोला जिल्ह्यात पिकावर कीटकनाशकाच्या फवारणी दरम्यान विषबाधा झालेल्या चौघांच्या मृत्यूविषयी आरोग्य यंत्रणेने प्रशासनाला कळवलेच नाही, अशी धक्कादायक माहिती कृषी विभागातील सूत्राने दिली. गेल्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या विषबाधा प्रकरणानंतर अशा मृत्यूंविषयी आरोग्य यंत्रणेने प्रशासनाला तात्काळ माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही अकोल्यात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळत दैनंदिन अहवाल दिला जात असल्याचे स्प्ष्ट केले आहे.

अकोला जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांचा पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यात राजू नामदेव राऊत (गायगाव), गजानन किसन बकाल (सुकोडा) यांच्यासह  दहिगाव (ता. तेल्हारा) येथील एक शेतकरी तसेच अकोट तालुक्‍यातील एक आदिवासी शेतकरी यांचा समावेश आहे. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेकडून माहिती मिळाली नाही; तर वृत्तपत्रांत आलेल्या बातम्यांमुळे या घटना समजल्या, असे कृषी विभागातील सूत्राने सांगितले.

वृत्तपत्रांतील बातम्यांनंतर कृषी विभागाने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून माहिती घेण्याचे प्रयत्न केले. त्यावर १४ ऑगस्टच्या अहवालात फवारणी दरम्यान विषबाधितांपैकी एकाचाही मृत्यू नसल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर २० ऑगस्टच्या अहवालात मात्र चौघांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली, असे कृषी विभागाच्या सूत्राने सांगितले.

गेल्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात कापसावरील बोंड अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकाची फवारणी करताना ४५० हून अधिक व्यक्तींना विषबाधा झाली. त्यातील १९ जणांचा मृत्यू झाला. राज्यभरात फवारणीदरम्यान विषबाधेमुळे बळींचा आकडा ४९ वर गेला. राज्य सरकारने त्याची दखल घेत यंदाच्या हंगामात फवारणी दरम्यान विषबाधा होऊन रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची स्वतंत्र नोंद करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, गेल्या वर्षीचा अनुभव आणि शासनाचे आदेश असूनही आरोग्य विभागाची यंत्रणा मात्र यासंदर्भात गंभीर नसल्याचेच उघड होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com