पीक वाचविण्याच्या संघर्षात ११ जणांनी गमावला जीव

पीक वाचविण्याच्या संघर्षात 11 जणांनी गमावला जीव
पीक वाचविण्याच्या संघर्षात 11 जणांनी गमावला जीव

यवतमाळ ः पीक वाचविण्याच्या संघर्षात फवारणी केल्यानंतर जिल्ह्यातील तब्बल ११ शेतकरी, शेतमजुरांना जीव गमवावा लागला. याच संघर्षात तब्बल ५६० पेक्षा अधिक व्यक्‍तींना विषबाधा झाली असून, या सर्वांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र नऊ लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी ५० टक्‍के म्हणजे साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. यावर्षी कपाशीवर सुरवातीला मावा, तुडतुडे, गुलाबी बोंडअळी व आता मिलीबगचा प्रादुर्भाव झाला आहे. एैन भरात आलेले हे पीक कीडरोगांमुळे हातचे जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांकडून हे पीक वाचविण्यासाठी सारे प्रयत्न अवलंबिले जात आहे.

त्याकरिता कपाशीवर सातत्याने फवारणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. जिल्ह्यात बीटी कपाशीची लागवड सर्वाधिक आहे. त्यातच शेतकऱ्यांनी शिफारसीत अंतराऐवजी सघन लागवड पद्धतीचा अंगीकार केला आहे. त्यामुळे कपाशीची झाड दाट झाली असून त्यांची वाढदेखील सहा फुटांपेक्षा अधिक आहे.

तांत्रिक ज्ञान नाही कपाशीचे कीड नियंत्रण मजुरांमार्फत केले जाते. त्याकरिता मजुरांच्या टोळ्या जिल्ह्यात आहेत. मजुरांना फवारणीचे तांत्रिक ज्ञान नाही. त्यातच मजुरांच्या उंचीपेक्षा कापसाच्या झाडांची उंची अधिक झाल्याने त्यावर फवारणी करताना तो अंश थेट तोंडात जातो. त्यामुळे सुमारे ११ मजुरांना महिनाभरात जीव गमवावा लागला. सात जणांमध्ये दृष्टिदोष निर्माण झाला आहे. त्यामध्ये हरबा भीमा टेकाम, काशिनाथ टेकाम, महेश पाचभाई, विलास राठोड, मारोती तुमराम, गजानन चाफले यांचा समावेश आहे.

सर्वाधिक बाधित तालुके तालुक्‍यात विषबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ आर्णी, वणी, पांढरकवडा, पुसद, महागाव या तालुक्‍यातील रुग्ण आहेत. बाधितांची संख्या ५६० पेक्षा अधिक असल्याने प्रशासनात हाहाकार उडाला आहे. शासकीस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी (ता.२८) उपचार सुरू असलेले १४६ रुग्ण होते.

मोठ्या संख्येने विषबाधित रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयात जागा नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्णांवर जमिनीवरच उपचार केले जात आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अमरावती जिल्ह्यातील धामनगावचेदेखील काही रुग्ण दाखल झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातदेखील फवारणी करताना विषबाधा झालेले रुग्ण आढळले असून त्यांच्यावरदेखील यवतमाळमध्ये उपचार सुरू आहेत.

मदतीची मागणी शेतमजुरांचे कुटूंब त्याच्या जाण्यामुळे रस्त्यावर येत असल्याने त्यांना पाच लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यासोबतच शेतकरी, शेतमजुरांना फवारणीची शास्त्रोक्‍त माहिती पोचविण्यात कुचराई करणाऱ्यांवर कारवाईची मागणीदेखील त्यांनी केली. कृषी विद्यापीठ, कृषी विभागाचे दुर्लक्ष या घटनांमागे असल्याचा आरोप तिवारी यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com