शेंदरी बोंडअळीने हिरवे स्वप्न चकनाचूर

सोयगाव जि. औरंगाबाद : तिडका येथील दौलत किसन खंबाट यांना दरवर्षी एकरी बारा क्‍विंटलपर्यंत कापूस होतो. यंदा सात एकरमध्ये केवळ ५० क्‍विंटलच कापूस झाला. शेंदरी बोंडअळीमुळे बोंड कीडकीच निघत आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी (ता.१२) कपाशीत रोटाव्हेटर फिरविला.
सोयगाव जि. औरंगाबाद : तिडका येथील दौलत किसन खंबाट यांना दरवर्षी एकरी बारा क्‍विंटलपर्यंत कापूस होतो. यंदा सात एकरमध्ये केवळ ५० क्‍विंटलच कापूस झाला. शेंदरी बोंडअळीमुळे बोंड कीडकीच निघत आहेत. त्यामुळे त्यांनी रविवारी (ता.१२) कपाशीत रोटाव्हेटर फिरविला.

औरंगाबाद : सप्टेंंबरमध्येच बहुतांश भागांत शेंदरी बोंडअळीच्या हल्ल्याने आर्थिक नुकसानाची ओलांडलेली पातळी आता गंभीर अवस्थेत पोचली आहे. पहिल्या वेचणीनंतर शेतकऱ्यांना दुसऱ्या वेचणीची गरजच उरल्याची स्थिती नसून, शेंदरी बोंडअळीने शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न चकनाचूर झाल्याचे चित्र मराठवाड्यात आहे.

कपाशीच्या उत्पादनाला ५० ते ७० टक्‍क्यांपर्यंत फटका बसल्याचे शेतकरी सांगत आहेत. या स्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी शासन-प्रशासन केव्हा पंचनामे व काय तपासण्या करणार याकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या खरिपात मराठवाड्यात सरासरीच्या ९१ टक्‍के क्षेत्रावर अर्थात १५ लाख ६४ हजार ९४ हेक्‍टरवरच कपाशीची लागवड झाली. यावर्षी जवळपास तीन आठवड्यांपर्यंत ढगाळ, दमट अर्थात कीडरोगांना पोषक वातावरणामुळे कपाशीवर रसशोषण करणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परतीच्या पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजल्याने संकटाच्या फेऱ्याने मराठवाड्यातील कापूस उत्पादकांचा पिच्छा सोडला नाही.

परतीच्या पावसाने कापूस भिजल्याने त्याचा दर्जा बिघडल्याचे कारण पुढे करून खासगी खरेदीदारांनी केवळ ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलपेक्षा कमी दरानेच खरेदी सुरू केली आहे.

शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव १० टक्‍क्‍यांपासून ७० ते ८० टक्‍क्‍यांपर्यंत झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, भविष्यात अशी स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी अपेक्षित कारणांची मीमांसा करणारे पंचनामे करून पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

मराठवाड्यात शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद प्रथम क्रमांकावर असून जालना, बीड आणि नांदेड अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहे.

बीड जिल्ह्यात शेंदरीचे प्रमाण ८० टक्क्यांवर बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई परळी भागातील कपाशीत क्रॉपसॅपअंतर्गत शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्या वेळी केलेल्या पाहणीत त्याचे प्रमाण २० ते ३० टक्‍के होते, तसा अहवालही त्या वेळी पाठविण्यात आला होता. आता हे प्रमाण नव्याने लागलेल्या बोंडात ७० ते ८० टक्‍क्यांपर्यंत पोचले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाच एकर कपाशीचे क्षेत्र आहे. आजवर सात फवारण्या केल्या; पण बोंडअळी नियंत्रणात आली नाही. एका फवारणीला किमान अडीच ते तीन हजार खर्च आला, तरीही ५० टक्‍के कापूस खराब निघतोय.

- श्रीधर पाचे, उंचेगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.  

चार एकर कपाशीतून आजवर केवळ १४ ते १५ क्‍विंटल कापूस मिळाला. आता असलेल्या बोंडांपैकी ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त बोंडांत अळीचा प्रादुर्भाव आहे. सहा फवारण्या केल्या पणं नियंत्रण नाही. यंदा कपाशीच्या उत्पादनात ७० टक्‍के फटका बसेल यात शंका नाही. - विनायक नाईकवाडे, दहीगव्हाण बु., ता. घनसावंगी, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com