अकोला ः बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे बीटी कपाशीचे मोठे नुकसान झाले अाहे. कापूस उत्पादक देशोधडीला लागला असून त्याला अार्थिक मदतीची मोठी गरज अाहे. ती मदत बीटी कंपन्या व शासनाकडून मिळवून देण्यासाठी अापण शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार अाहे. यासाठी कापूस उत्पादकांनीही एकसंधपणे तयार राहावे, असे अावाहन शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केले.
मूर्तिजापूर तालुक्यातील जांभा येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रगती शेतकरी मंडळ, जनमंच संघटना, शेतकरी कामगार पक्ष, न्यू यंग क्लब फार्मर्स ग्रुप यांनी या कार्यक्रमाचे अायोजन केले होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले, की देशातील कापड उद्योगपती शेतकऱ्यांचे शोषण करून मोठे झाले असून त्यांनाच फायदा व्हावा, या हेतूने नियम व अायात-निर्यात धोरण ठरविल्या जाते. अाता तर व्यापारी वर्गातील लोकसुद्धा निवडून यायला लागले.
शेतकऱ्यांचे प्रश्न अात्महत्या करून सुटत नाहीत, तर ते अधिक जटील बनत अाहेत. अाता तर ऊस पट्ट्यातही अात्महत्या सुरू झाल्या असल्यामुळे शेतकऱ्यांना संपविण्याचा घाट मोठमोठ्या उद्योगाच्या मदतीने घातल्या जात अाहे.
शेती प्रश्न सरकारने निर्माण केले. उत्पादन खर्च त्यावर अधिक ५० टक्के नफा असे अाश्वासन देऊन सत्तारूढ झालेल्या मोदी सरकारने मात्र असा बाजारभाव देणे शक्य नाही, असे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून अाश्वासन मोडीत काढत विश्वासघात केला, अशी टीकाही त्यांनी केली. या वेळी विजय गावंडे, राजू वानखडे, किशोर ढमाले यांनीही मनोगत व्यक्त केले.