नगर ः बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या कापसाच्या क्षेत्राचे पंचनामे सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तेरा तालुक्यांतील १ लाख ५४ हजार २४२ शेतकऱ्यांचे एक लाख आठ हजार १५७ हेक्टर क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने त्या क्षेत्राचे पंचनामे केले आहेत. शेवगाव तालुक्यात सर्वाधिक क्षेत्र आहे.
साखर कारखानदारीचा जिल्हा असलेल्या नगरमध्ये आता अकोले वगळता सर्वच्या सर्व तेरा तालुक्यांत कापसाचे क्षेत्र वाढू लागल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.
नगर जिल्ह्यामध्ये कापसाचे क्षेत्र वाढत आहे. जिल्ह्यात कापसाचे सरासरी साठ हजार हेक्टर क्षेत्र होते. मात्र, अलीकडच्या काळात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याने सरासरी क्षेत्र एक लाख हेक्टर झाले आहे.
यंदा जिल्हाभरात एक लाख पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड झाली आहे.
सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने लागवड क्षेत्र वाढले असले, तरी नंतरच्या काळात पावसाने दिलेला ताण आणि सरतेशेवटी झालेला जोराचा पाऊस यामुळे नुकसान झाले आणि त्यात पुन्हा बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे साधारण साठ ते सत्तर टक्के नुकसान झाले. त्यामुळे पीक घेण्यासाठी झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी सुरू झाली.
हिवाळी अधिवेशनातही कापसावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावाचा प्रश्न चर्चिला गेला. सदोष बियाण्यांचा विषय पुढे येऊन नुकसानभरपाई देण्याचे सरकारकडून आश्वासन मिळाले व सरकारनेही पंचनामे सुरू केले आहेत. जिल्हाभरात आतापर्यंत १ लाख ५४ हजार २४२ शेतकऱ्यांच्या शेतातील १ लाख आठ हजार १५७.३० हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे बोंड अळीने नुकसान झाले असून, या पिकाचे पंचनामे सुरू आहेत.
बोंड अळीने बाधित झालेल्या कापसाच्या क्षेत्राचा विचार करता जिल्ह्यामध्ये कापसाच्या नुकसानीतून मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने प्रतिहेक्टर ३६ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे बाधित क्षेत्राला भरपाई देण्यासाठी जिल्ह्याला सुमारे तीनशे नव्वद कोटी रुपयांची आवश्यकता आहे.