परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुलाबी बोंड अळीमुळे नुकसान झाल्याच्या ६९ हजारांवर तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. बाधित क्षेत्रापैकी ३५,१३१ हेक्टरवरील ९२ हजार शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाचे पंचनामे करण्यात आले. अजून अर्ध्याहून कमी क्षेत्रावरील पंचनामे झालेले नाहीत. शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पंचनाम्याची कामे युद्धपातळीवर होणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात यंदा लागवड झालेले कपाशीचे संपूर्ण १ लाख ९१ हजार ७०९ हेक्टर क्षेत्र गुलाबी बोंड अळीमुळे बाधित झाले आहे. बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी जी फाॅर्म नमुन्यातील ६९ हजारांंवर तक्रारी कृषी विभागाकडे सादर केल्या आहेत. आजवर ९२ हजार ८२४ शेतकऱ्यांच्या ३५ हजार १३१.५ हेक्टरवरील बोंड अळीग्रस्त कपाशीच्या पिकाचे पंचनामे करण्यात आले आहेत.
यामध्ये परभणी तालुक्यातील १७,८६० शेतकऱ्यांचे ६४०४ हेक्टर, जिंतूरमधील ११,४३१ शेतकऱ्यांच्या १४१० हेक्टर, सेलूमधील ९६४० शेतक-यांच्या १२ हजार ५६ हेक्टरवरील, मानवतमधील ११,७५० शेतकऱ्यांच्या २७४२ हेक्टरवरील, पाथरीमधील ११,४३१ शेतकऱ्यांच्या २२०५ हेक्टर, सोनपेठमधील ५६७५ शेतकऱ्यांच्या ७८५.५ हेक्टरवरील, गंगाखेडमधील ७९०० शेततकऱ्यांच्या १४५० हेक्टरवरील, पालम तालुक्यातील ५२५० शेतकऱ्यांच्या १५३२ हेक्टरवरील, पूर्णा तालुक्यातील ४७९० शेतकऱ्यांच्या ६५४७ हेक्टरवरील कपाशी पिकाचा समावेश आहे.
संपूर्ण क्षेत्र बाधित असल्यामुळे पंचनाम्याच्या कामांना उशीर होत आहे. शासनाने जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी पंचनाम्याची कामे वेगाने पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे.