सांगली ः सांगली जिल्ह्यातील आटपाडी व मिरज तालुक्यांतील खटाव या भागातील शेतकरी कापसाची लागवड करतात. जिल्ह्यात अंदाजे ३० ते ४० एकरांवर कापसाची लागवड आहे. विदर्भातील कापसावर बोंड अळीचा मोठा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात देखील कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
मात्र, जिल्ह्यात कापसाचे अत्यल्प क्षेत्र असल्याने कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची चर्चा सुरू आहे. कीड बाधित झालेल्या कापसाचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आटपाडी तालुक्यात पूर्वी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड व्हायची. मात्र, बोगस बियाण्यांमुळे तालुक्यातील कापसाची लागवड करणे थांबविली आहे. मात्र, आजही या तालुक्यात कापसाची लागवड अत्यल्प प्रमाण केली जाते. तसेच मिरज तालुक्यातील खटाव या गावातदेखील तीन ते चार वर्षांपूर्वी ३५ हेक्टरवर कापसाची लागवड होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून बोगस बियाण्यामुळे येथीलही शेतकऱ्यांनी कापूस लागवड थांबविली आहे. असे जरी असले तरी अनेक शेतकरी कापसाची लागवड आजही करताहेत.
जिल्ह्यात सुमारे ४० ते ५० शेतकरी कापसाचे उत्पादन नेहमीच घेतात. गेल्या वर्षी बियाणे चांगले मिळाले, कोणत्याही कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही, तसेच दरही चांगला मिळाला. जरी या भागात कापसाची बाजारपेठ नसली तरी विजापूर येथील बाजारपेठेचा शेतकरी आधार घेतात. मात्र, यंदाच्या हंगामात कापसाची केवळ वाढच झाली आहे. बोंडे लागली असली तरी त्यांची संख्या कमीच आहे. त्यामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाले आहे. त्याच बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहे.
विदर्भात बोंड अळीने कापूस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सांगली जिल्ह्यात कोणत्या भागात कापसाचे पीक घेतले जाते. किती शेतकरी आहेत, कापसावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे काय याची माहितदेखील जमा करण्याची तसदी कृषी विभागाने घेतली नाही. कृषी विभागाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची चर्चा कापूस उत्पादक शेतकरी करू लागला आहे.