नाशिक : विदर्भातील कपाशीवर थैमान घातलेल्या बोंड अळीने उत्तर महाराष्ट्रतील कपाशीला ही आपल्या कवेत घेतल्याचे चित्र आहे. जळगाव जिल्ह्यातील ४.७६ लाख हेक्टरपैकी सुमारे ३.८६ लाख हेक्टर (८१ टक्के) क्षेत्र या किडीने बाधित झाले आहे. तीच स्थिती धुळे जिल्ह्यात असून, तेथील २.०५ लाख हेक्टरपैकी सर्व १०० टक्के क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे स्पष्ट आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील १.०२ लाख हेक्टर कपाशीपैकी ०.३६ लाख हेक्टरला बोंड अळीने दणका दिला. त्या पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातील ०.४६ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ०.१८ लाख (३९ टक्के) क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात ३९ टक्के पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
विधानसभेत हा प्रश्न गाजला. त्यांनतर प्रशासनाने पंचनाम्याचे आदेश दिले, तरी नुकसानभरपाईबाबत पुन्हा अटी- शर्तीचा गोंधळ कायम आहे. बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राचे अजून पंचनामे झालेले नाहीत. शासनाने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पंचनामे होतील पण ते झाल्यानंतर मदतीबाबत पुन्हा गोंधळच आहे.
पीकविमा उतरविला आहे असे, विमा नाही असे, याशिवाय आपत्कालीन स्थितीच्या मदतीच्या आदेशात बसणाऱ्या अशा तीन वेगवेगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या एकाच प्रकारचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मात्र भिन्न भिन्न स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. त्याबाबत शासनही सतर्क आहे. म्हणून तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांची माहिती घेत त्यानंतर मदत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे बोंड अळीच्या नुकसानीबाबत मदत मिळण्यात दिरंगाईची शक्यता आहे.
इगतपुरीत सोनोशी गावात हरभरा पिकावर मर रोगाचा, तर तुरीच्या पिकावर तीन गावांत शेंगमाशी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. इगतपुरी तालुक्यात मर व शेंगमाशी रोंगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत चार गावांत प्रादुर्भाव दिसून आला आहे. तूर पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावाने गावच्या गावे बाधित झाल्याचे प्राथमिक पाहणीत आढळले आहे.