सांगली जिल्ह्यात डाळिंब उत्पादन घटण्याची चिन्हे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
सांगली ः मागील महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विक्रीयोग्य तयार झालेली फळे कुजू लागली आहेत. यामुळे उत्पादनात सुमारे ५० टक्के घट होण्याची शक्‍यता आहे.
 
जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्‍टरहून अधिक डाळिंब क्षेत्र आहे. आटपाडी, तासागाव, जत, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत पाणीटंचाई कायमस्वरूपाची आहे. सुरवातीपासूनच शेतकऱ्यांनी टॅंकरद्वारे पाणी देऊन डाळिंबाच्या बागा जगवल्या आहेत.
 
सिंचन योजनेचे पाणी शिवारात आल्याने काही प्रमाणात पाणीटंचाई दूर झाली. यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. शेतकऱ्यांनी चांगले वातावरण म्हणून जून-जुलै महिन्यांत बागांची छाटणी घेतली. ऑगस्ट महिन्यात औषध फवारणी, मशागतीची कामे केली व बहर धरला. पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरणामुळे तेलकट रोगाचा प्रादुर्भाव झाला.
 
यामुळे बाधित झालेली डाळिंब काढून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा पर्याय नव्हता. त्यातूनही शेतकरी सावरले. मात्र सप्टेंबर व ऑक्‍टोबर महिन्यांतील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पुन्हा शेतकरी अडचणीत आला. काही ठिकाणी बागामध्ये फुलकळीची मोठ्या प्रमाणात गळ झाली. सध्या विक्रीला आलेली डाळिंब पिके कुजू लागली आहेत.
 
कितीही औषध फवारणी करुनही उपयोग होत नसल्याने शेतकऱ्यांना कुजलेली डाळिंबे काढण्यासाठी मजुरीचा खर्च परवडेनासा झाला आहे. त्यात सध्या डाळिंबाचे दर अत्यंत कमी झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
 
नोव्हेंबर महिन्यात फळांची विक्री सुरू होते. परतीच्या पावसामुळे डाळिंबाचे मोठे नुकसान झाले. रात्रंदिवस कष्ट करून शेतकऱ्यांनी बागा जोमात वाढविल्या. मात्र दर अत्यंत कमी सुरू असल्याने, बागेचा खर्च तरी निघेल की नाही, याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. 
 
आटपाडी तालुक्‍यात अधिक फटका 
आटपाडी सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्‍यात आहे. या तालुक्‍यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मृग बहर घेतात. गेल्या वर्षीदेखील पावसाने मोठ्या प्रमाणात डाळिंबाचे नुकसान झाले होते. यामुळे यंदा तिच परिस्थिती राहणार का, अशी चर्चा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांत होती. मात्र सुरवातीला पावसाने दांडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली.
 
तालुक्‍यात यंदा परतीच्या पावसाने थैमान घातले. त्यामुळे बहरलेली डाळिंबाच्या बागा पावसामुळे धोक्‍यात आल्या. तालुक्‍यात सुमारे २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्‍यता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी वर्तविली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com