राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीत

यंदा डाळिंब हंगाम उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. वाढत्या उष्णतेमुळे डाळिंबाची पक्व काडी कमकुवत झाली असल्याने पुरेसे अन्नद्रव्ये मिळत नाहीत. त्यामुळे डाळिंबाचे उत्पादन घटणार आहे. - किशोर देशमुख, डाळिंब उत्पादक, आटपाडी, जि. सांगली.
डाळिंब बागेत कामे करताना शेतकरी.
डाळिंब बागेत कामे करताना शेतकरी.

सांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार हेक्टर आहे. त्यापैकी मृग बहरात ४० टक्के डाळिंब उत्पादन घेतले जाते. परंतु दुष्काळी स्थिती आणि पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर केवळ १५ ते २० टक्के क्षेत्रावरील डाळिंबाचा बहर धरला आहे. यंदा हंगाम एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्यता असून, पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

राज्यात डाळिंबाचा मृग, हस्त आणि आंबे बहर धरला जातो. मृग बहर घेण्यासाठी शेतकरी नियोजन करीत आहेत. राज्यातील अनेक भागात सिंचन योजना आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची सोय आहे, अशाच शेतकऱ्यांनी डाळिंबाचा मृग बहर धरला आहे. परंतु दिवसेंदिवस पाण्याची समस्या तीव्र होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब बागांना टॅंकरने पाणी देण्यास सुरवात केली आहे. परंतु १२ हजार लिटरच्या टॅंकरसाठी ३ ते ४ हजार रुपये मोजावे लागत आहेत. मात्र टॅंकरने पाणी देण्यासाठी जवळपास कुठेही पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, मृग बहरावर संकट आले आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर डाळिंबाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. 

ज्या शेतकऱ्यांनी पाणी उपब्धतेनुसार हा बहर धरला आहे. त्यांना सातत्याने ढगाळ हवामान, वाढत्या उष्णतेचा फटका बसत आहे. त्यातच पाणी कमी पडत असल्याने कळी निघत नाही. त्याच बरोबर पानांचा आकारदेखील लहान झाला आहे. या सर्व घटकांचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली असून, उत्पादन कमी मिळाले तर आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने बाग वाचविण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी डाळिंब उत्पादकांनी केली आहे. 

‘सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही’ २०१३ मध्ये भीषण दुष्काळ होता. याचा परिणाम फळबागांवर होऊ लागला होता. पाणी नसल्याने बागा सोडून दिल्या होत्या. मात्र तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन योजनेतून फळ बागांसाठी हेक्टरी ३० हजार रुपयांचे अनुदान दिले होते. त्यामुळे केवळ बागा जगविण्यासाठी आधार मिळाला होता. त्यातूनही शेतकऱ्यांनी डाळिंबाचे उत्पादन घेतले होते. मात्र या सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.    २५ टक्के बागांचे झाले सरपण गेल्या वर्षी राज्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. वळवानेही दगा दिला. त्यामुळे भूजल पातळीत कमालीची घट झाली आहे. उपसा सिंचन योजना सुरू आहेत. परंतु धरणांमध्ये पाणी नसल्याने या योजनाही बंद होऊ लागल्या आहेत. राज्यात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यातूनही काही शेतकरी डाळिंब बागा जगवत आहेत. मात्र पाणी नसल्याने अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील सुमारे २५ टक्के बागा पाण्याविना जळून गेल्या आहेत.   

यंदा दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. यामुळे फळबागांचे नुकसान झाले आहे. फळबागा या बहुवार्षिक आहेत. बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च आहे. अशा परिस्थितीत शासनाने फळबागांसाठी तत्काळ पॅकेज देण्याची गरज आहे, असे महाऑरगॅनिक ॲण्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोशिएशनचे अध्यक्ष अंकुश पडवळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com