अकोला : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने, तसेच पडलेले पाणी जमिनीत मुरलेले नसल्याने पाणीपातळी कमालीची खालावत आहे. याचा परिणाम यावर्षी जानेवारीपासून दिसायला लागला. दुष्काळी स्थितीचे चटके शेतकऱ्यांना बसू लागले आहेत. अकोला तालुक्यातील कापशी शिवारात दोन - तीन शेतकऱ्यांनी लिंबू बागा उपटून टाकल्या तर प्रकाश गवई यांच्यावर डोळ्यासमोर दिसणारा डाळिंबाचा बहार सोडून देण्याची वेळ आली.
गवई कुटुंबाकडे २१ एकर शेती आहे. तिघा भावांच्या या शेतीत चार बोअरवेल, तीन विहिरी आहेत. सध्या या सर्व स्त्रोतांमधून अर्धा ताससुद्धा पुरेसे पाणी मिळत नाही. तीन एकरांत त्यांनी चार वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग मोठ्या मेहनतीने उभी केली. आजवर साडेचार ते पावणे पाच लाख रुपये खर्च झाले. गेल्यावर्षी पहिला बहार धरला. मात्र वन्यप्राण्यांनी ही फळे फस्त केली होती. या धक्क्यातून सावरत त्यांनी यावर्षी बहार नियोजनाची तयारी सुरू केली होती.
परंतु, विहिरी कोरड्या पडल्याने तसेच बोअरमधूनही पुरेसे पाणी मिळण्याची शाश्वती दिसत नसल्याने त्यांनी डाळिंबाचा बहार सोडून दिला आहे.सध्या बोअरचे पाणी विहिरीत आणून टाकले जाते. त्या पाण्यावर अवघा अर्धा तास कृषिपंप चालतो. एवढ्या पाण्यावर केवळ जनावरांसाठी लावलेल्या चाऱ्याला पाणी देणे शक्य होत आहे. येत्या दोन महिन्यांत हेही पाणी मिळेल की नाही याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे आता शेतात कुठलेही पीक घेता येणार नसल्याचे ते सांगतात.
या वर्षात खरिपात सोयाबीन, कापूस ही पिके घेतली. सोयाबीन एकरी पाच तर बागायती कापूस चार एकरात फक्त २० क्विंटल झाला. खरिपात झालेल्या एकूण उत्पन्नापेक्षा ६० हजार रुपये खर्च झालेला आहे.
गवई यांच्याकडे चार म्हशी आहेत. यापासून दररोज ४० लिटर दूध मिळते आहे. अडीच लाखांत या म्हशी आणलेल्या आहेत. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला नाही. म्हशी, बैलजोडीला हिरवा चारा मिळावा म्हणून चाऱ्याची लागवड केलेली आहे. या चाऱ्याला द्यायलासुद्धा पुरेसे पाणी नाही. टप्प्याटप्प्याने पाणी द्यावे लागते. चाऱ्याचेही ओलित होऊ शकत नाही. अर्धा ताससुद्धा हा पंप चालत नाही.