पाणीटंचाईमुळे अकोल्यात डाळिंब बहर सोडून देण्याची वेळ

आमचे गाव पूर्वीपासून जलसमृद्ध होते. गावाशेजारी मोठा कापशी तलाव आहे. पाऊस पुरेसा होत नसल्याने हा तलाव भरत नाही. परिणामी, पाणीपातळी घटली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पाण्याची इतकी भीषण स्थिती पहिल्यांदा पाहत आहे. पाण्याची व्यवस्था करू शकत नसल्याने डाळिंब बहरावर मला पाणी सोडून द्यावे लागले. मार्च महिन्यातच ही परिस्थिती आहे तर पुढील काळ किती बिकट जाईल, याची कल्पना करवत नाही. शेतीला पूरक म्हणून आधीपासून दुग्ध व्यवसाय व शेळी पालन करीत असल्याने कुटुंबाला तेवढा आधार मिळत आहे. - प्रकाश गवई, शेतकरी, कापशी
डाळिंब बहर
डाळिंब बहर
अकोला : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पाऊस कमी होत असल्याने, तसेच पडलेले पाणी जमिनीत मुरलेले नसल्याने पाणीपातळी कमालीची खालावत आहे. याचा परिणाम यावर्षी जानेवारीपासून दिसायला लागला. दुष्काळी स्थितीचे चटके शेतकऱ्यांना बसू लागले आहेत. अकोला तालुक्‍यातील कापशी शिवारात दोन - तीन शेतकऱ्यांनी लिंबू बागा उपटून टाकल्या तर प्रकाश गवई यांच्यावर डोळ्यासमोर दिसणारा डाळिंबाचा बहार सोडून देण्याची वेळ आली.
 
गवई कुटुंबाकडे २१ एकर शेती आहे. तिघा भावांच्या या शेतीत चार बोअरवेल, तीन विहिरी आहेत. सध्या या सर्व स्त्रोतांमधून अर्धा ताससुद्धा पुरेसे पाणी मिळत नाही. तीन एकरांत त्यांनी चार वर्षांपूर्वी डाळिंबाची बाग मोठ्या मेहनतीने उभी केली. आजवर साडेचार ते पावणे पाच लाख रुपये खर्च झाले. गेल्यावर्षी पहिला बहार धरला. मात्र वन्यप्राण्यांनी ही फळे फस्त केली होती. या धक्‍क्‍यातून सावरत त्यांनी यावर्षी बहार नियोजनाची तयारी सुरू केली होती.
 
परंतु, विहिरी कोरड्या पडल्याने तसेच बोअरमधूनही पुरेसे पाणी मिळण्याची शाश्‍वती दिसत नसल्याने त्यांनी डाळिंबाचा बहार सोडून दिला आहे.सध्या बोअरचे पाणी विहिरीत आणून टाकले जाते. त्या पाण्यावर अवघा अर्धा तास कृषिपंप चालतो. एवढ्या पाण्यावर केवळ जनावरांसाठी लावलेल्या चाऱ्याला पाणी देणे शक्‍य होत आहे. येत्या दोन महिन्यांत हेही पाणी मिळेल की नाही याची शक्‍यता दिसत नाही. त्यामुळे आता शेतात कुठलेही पीक घेता येणार नसल्याचे ते सांगतात.
 
या वर्षात खरिपात सोयाबीन, कापूस ही पिके घेतली. सोयाबीन एकरी पाच तर बागायती कापूस चार एकरात फक्त २० क्विंटल झाला. खरिपात झालेल्या एकूण उत्पन्नापेक्षा ६० हजार रुपये खर्च झालेला आहे.
 
गवई यांच्याकडे चार म्हशी आहेत. यापासून दररोज ४० लिटर दूध मिळते आहे. अडीच लाखांत या म्हशी आणलेल्या आहेत. यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. म्हशी, बैलजोडीला हिरवा चारा मिळावा म्हणून चाऱ्याची लागवड केलेली आहे. या चाऱ्याला द्यायलासुद्धा पुरेसे पाणी नाही. टप्प्याटप्प्याने पाणी द्यावे लागते. चाऱ्याचेही ओलित होऊ शकत नाही. अर्धा ताससुद्धा हा पंप चालत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com