परभणी : वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या तलावांतील उपयुक्त पाणीसाठ्यात घट सुरूच आहे. आठवडाभरात भोसी (ता. जिंतूर) येथील लघू तलाव कोरडा पडल्यामुळे कोरड्या पडलेल्या तलावांची संख्या सात झाली आहे. २२ पैकी केवळ ५ तलावांमध्ये उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. पाणीटंचाईचे संकट दिवसगणिक गडद होत आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २७ पर्यंत पोचली आहे.
रविवारी (ता. १३) पैठण येथील जायकवाडी धरणात ३४.४५, माजलगाव प्रकल्पात १८.२१, निम्न दुधना प्रकल्पात २७.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. आठवडाभरामध्ये या तीन धरणातील पाणीसाठ्यात अनुक्रमे ३.२८, ०.७ आणि ८.६६ टक्के घट झाली आहे. निम्न दुधना धरणातून परभणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे उपयुक्त पाणीसाठ्यात घट झाली आहे.
येलदरी आणि सिध्देश्वर या दोनही धरणांतील मृत पाणीसाठ्यात घट होत आहे. करपरा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठवडाभरात २ टक्के घट झाली असून, रविवारी या धरणात १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. २२ लघू तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव, भोसी हे सात तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदुळवाडी, राणीसावरगाव, कोद्री, देवगाव, वडाळी, चारठाणा, केहाळ या आठ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.
उर्वरित तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे या तलावात आता ९३ टक्के पाणीसाठा आहे. पेडगाव आणि आंबेगाव तलावामध्ये केवळ १, पिंपळदरीमध्ये ५.६, कवडा तलावामध्ये ९, मांडवी तलावामध्ये २, पाडाळी तलावामध्ये ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे.
भूजलपातळी गतवर्षीपेक्षा खोल गेली आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरी, बोअरची संख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात २६ टॅंकर सुरू होते. त्यामध्ये एकाची भर पडल्यामुळे टॅंकरची संख्या २७ झाली आहे.