संपूर्ण भारतात ब्रॉयलर पक्ष्यांचे बाजारभाव ८५ रुपये प्रतिकिलोंवर पोचले आहेत. उन्हाळ्यातील उत्पादनघटीचा प्रभाव देशभरातील बाजारावर दिसला आहे. खासकरून दोन किलो वजनावरील पक्ष्यांच्या बाजार जोरदार तेजीत आहे.
नाशिक विभागात शनिवारी (ता. ५) ९१ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिनाभरातील नीचांकी पातळीवरून बाजार ८० टक्क्यांनी सुधारला आहे.
खडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी सध्याच्या बाजाराबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षणे मांडली आहेत. १. लहान पक्ष्यांचा बाजार ७० रुपयांनी खालावला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची वाढ न होणे, वाहतुकीदरम्यान वजन घटणे आदी कारणांमुळे लहान मालास कमी मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर लहान मालाचा होत असलेला पुरवठा हा येत्या दिवसांतही तेजी लांबण्यासाठी पुरक ठरणार आहे.
२. दक्षिण भारतात - कर्नाटकातील निवडणुकांमुळे ब्रॉयलर्सच्या खपाला चालना मिळाली आहे. शिवाय, तेथे उत्पादन घटीची समस्या अधिक तीव्र आहे. दुसरीकडे, उत्तर-पूर्वेतील बाजार १०० रुपये प्रतिकिलोंवर तर दिल्ली - उत्तर प्रदेशात १०० रुपयांच्या आसपास बाजार उंचावला आहे. एकूणच संपूर्ण भारतातील बाजार ८५ रुपयांवर आहे.
३. मधल्या काळात हॅचिंग एग्ज आणि चिक्सचे दर समान पातळीवर होते. त्यामुळे अंड्यांना मागणी घटून आता त्यांचे बाजारभाव चिक्सच्या तुलनेत ११ रुपयांनी कमी झाले आहेत. सामान्यपणे चिक्सच्या तुलनेत हॅचिंग एग्जचा बाजार २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी राहत नाही.
४. चिक्सचा बाजारभावात फार मोठी वाढ अपेक्षित नाही. उत्तर भारतात १८ ते २८ या रेंजमध्ये चिक्सची उपलब्धता आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे वाहतूक करण्यात जोखीम असल्याने महाराष्ट्रातील बाजारावर मोठा प्रभाव पडणार नाही.
५. चिकनची किरकोळ विक्री सामान्य आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे विक्री झाली आहे. ६.चालू आठवड्यातही बाजारभाव टिकून राहील. ओपन फार्मर्सनी दुपारच्या वेळेत फार्मवर थांबून उन्हाळी नियोजन काटेकोरपणे करावे आणि पक्षी मोठे करून विकावेत.
आठवडाभरात टेबल एग्जच्या बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली. दरवर्षी १५ मे नंतर अंड्याच्या बाजारभावात तेजीचा कल दिसतो. या वर्षीही त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. अमरावती येथील पोल्ट्री उद्योजक रवींद्र मेटकर म्हणाले, की तापमानवाढीचा मोठा फटका लेयर उद्योगाला बसला आहे. अशावेळी पक्ष्यांची प्रतिकारक्षमता कमी होऊन विषाणूजन्य प्रादुर्भाव वाढतो. सध्या एकूणच उत्पादन १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
तथापि, उन्हाळ्यात अंड्यांना मागणी कमी असते. त्यामुळे उत्पादनघटीचे रूपांतर भाववाढीत दिसलेले नाही. यापुढील काळात घटता पुरवठा लक्षात घेता बाजारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.