नवी दिल्ली ः पीक अवशेष शेतात जाळल्याने प्रदूषण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करणे अाणि त्यावर पर्याय म्हणून पीक अवशेषचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक अवशेषाची प्रतिटन ५,५०० रुपयाने खरेदी केली जाणार अाहे. यासाठी नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) पीक अवशेष खरेदीसाठी निविदा मागविणार अाहे. याबाबतची माहिती केंद्रीय वीज राज्यमंत्री अार. के. सिंह यांनी दिली अाहे.
पीक अवशेष जाळण्याएेवजी त्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांना प्रतिएकर ११ हजार रुपये मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले अाहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश अाणि राजस्थानमध्ये भात पीक कापणीनंतर पिकांचे अवशेष शेतातच जाळले जातात. यामुळे दिल्ली एनसीअारमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले अाहे.
या पार्श्वभूमीवर पीक अवशेष जाळण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कृती अाराखडा तयार केला जात अाहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ‘एनटीपीसी’ला नोटीस बजावून तुम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक अवशेष का घेऊ शकत नाही, अशी विचारणा केली होती. त्यावर अाता कार्यवाही करण्यात येत अाहे.
एक एकर क्षेत्रातील पिकातून सरासरी दोन टन अवशेष शिल्लक राहते. हे पीक अवशेष खरेदी करण्यासाठी लवकरच निविदा जारी केली जाणार असल्याचे वीज राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले.
वीज प्रकल्पात १० टक्के पीक अवशेषाचा वापर करणे शक्य अाहे, असेही त्यांनी नमूद केले. याबाबत माहिती देताना वीज सचिव ए. के. भल्ला यांनी सांगितले, की शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या पीक अवशेषाचा वापर तूर्त यंदा वीज प्रकल्पात होणार नाही; मात्र पुढील काही दिवसांत त्याचा वापर वीज प्रकल्पात करण्यासाठी पीक अवशेष खरेदीची कार्यवाही केली जाणार अाहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.