जळगाव ः मागील तीन दिवसांत झालेल्या पावसामुळे जवळपास ३० हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कपाशीमधील बोंडे काळवंडली असून, सोयाबीन, ज्वारीला कोंब फुटतील की काय, अशी धास्ती निर्माण झाली आहे. कोरडवाहू कपाशीला पावसामुळे दिलासा मिळालेला असला, तरी इतर पिके हातची जाण्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा दिवाळीपूर्वीचा उत्साह कुठेही दिसत नसल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला यंत्रणा तोकडी असल्याने पंचनामे फारशा गतीने सुरू नाहीत.
जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी विभागाने विविध तालुक्यांमधून याबाबत अहवाल मागविला आहे. जिल्ह्यात अमळनेर, चोपडा, भुसावळ, पारोळा, भडगाव येथे बुधवारीदेखील (ता.११) पाऊस झाला. चोपडा तालुक्यात मागील तीन दिवसांत ४०, जळगावात १८, चाळीसगावात सर्वाधिक ४१ आणि यावल व रावेरमध्ये १९ मिमी पाऊस झाला आहे.
धुळे भागात ज्वारीचे नुकसान झाले आहे. या जिल्ह्यात मागील तीन दिवसांत धुळे तालुक्यात मंगळवारपर्यंत (ता.१०) २२.४, साक्रीत ४.६ , शिरपुरात ३२.३ तर शिंदखेडा तालुक्यात १८.६ मिमी पाऊस झाला आहे. धुळ्यात पावसाचा कोरडवाहू कपाशी, मका या पिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु ज्वारी काळवंडू लागली आहे.
शिरपूर, शिंदखेडा, धुळे तालुक्यांतील पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला आहे. नुकसानीमुळे खरीप पीकविमा योजनेतून पंचनामे करून भरपाई मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाची आकडेवारी कमी दिसत असली तरी काही भागांत अधिकचा पाऊस झाला. त्याचा फटका पिकांना बसला आहे. धुळेसह जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाकडे बुधवारपर्यंत (ता.११) नुकसानीसंबंधीची माहिती आलेली नव्हती. अर्थातच यंत्रणा तोकडी आहे.
जळगाव जिल्ह्यात कृषी सहायकांची २३८ पदे रिक्त आहेत. धुळे जिल्ह्यातही १०० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. तलाठी कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पंचनाम्यांची मागणी शेतकरी करीत असले तरी पंचनामे सुरू झालेले नाहीत, अशी माहिती आहे.