अकोला : गत आठवड्यात काही भागांत संततधार पाऊस झाल्याने मॉन्सूनपूर्व लागवड केलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. झाडांवर लागलेल्या बोंड्या कुजल्याने पहिला वेचा नष्ट झाला आहे. दसऱ्यापासून या शेतकऱ्यांच्या घरात ‘पांढरे सोने’ (कापूस) यायला सुरवात झाली असती. परंतु हा पहिला बहर पूर्णपणे नष्ट झाला आहे.
वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत काही तालुक्यांमध्ये प्री-मॉन्सून कपाशीची लागवड केली जाते. यात प्रामुख्याने अकोला जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, अकोला तर बुलडाणा जिल्ह्यात संग्रापमूर, जळगाव जामोद, नांदुरा, मलकापूर आदी तालुक्यांचा समावेश आहे. या वर्षी सुरवातीला पावसाची उघडीप कपाशीला बाधक ठरली होती.
आता सप्टेंबरमध्ये गेल्याच आठवड्यात या भागात संततधार पाऊस झाला. त्याशिवाय सुमारे आठवडाभर ढगाळ वातावरण बनलेले होते. यामुळे कपाशीच्या झाडांवर लागलेल्या बोंड्या काळवंडल्या. प्रत्येक झाडावर १५ ते २० बोंड्या अशा काळवंडल्या असून, त्यावर बुरशी आली आहे. वास्तविक दसऱ्यापूर्वी शेतकरी ‘सीतादही’ (कापूस वेचणीचा प्रारंभ) करण्याच्या तयारीत होते.
तेल्हारा तालुक्यातील खापरखेड हे गाव कापूस उत्पादनात अग्रेसर मानले जाते. शेतकऱ्यांनी या वर्षी लागवड केलेली कपाशी चांगली साधली होती. काहींनी भरउन्हात कपाशीची लागवड केली. त्यामुळे या शेतातून आता कापूस यायला सुरवात झाली असती. मात्र सध्या प्रचंड नुकसानाला शेतकरी सामोरे जात आहेत. खारपखेड येथील तुळशीराम ओंकार खोटरे यांनी तीन एकरात लावलेल्या संपूर्ण कपाशीचे नुकसान झाले. खोटरे यांच्यासारखे असंख्य कापूस उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.