वादळी पावसाने दाणादाण

गारपिटीमुळे टरबूज पिकाचे झालेले नुकसान.
गारपिटीमुळे टरबूज पिकाचे झालेले नुकसान.

पुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह होत असल्याने पूर्वमोसमी पावसाने राज्यात चांगलीच दाणादाण उडवून दिली आहे. राज्यातील नाशिक, जळगाव, पुणे, अकोला, नांदेड, परभणी, हिंगोलीत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी (ता. १६) विविध ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटना घडून आठ जणांचा मृत्यू झाला, तर पशूधन आणि शेतीमालाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.   वादळी वाऱ्यामुळे फळझाडांबरोबर, शेडनेट, पॉलिहाउसलाही फटका बसला आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत असून, निवडणुकीच्या कामांमुळे पंचनामे ठप्प असल्याची स्थिती आहे.  अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडात मंगळवारी (ता. १६) दुपारी व रात्री ठिकठिकाणी झालेल्या पूर्वमोसमी पावसाने दाणादाण उडविली. वादळ आणि जोरदार पाऊस, काही ठिकाणी गारपिट झाल्यामुळे बीजोत्पादन कांदा, फळबागा, गहू या पिकांचे नुकसान झाले. वीज पडल्याने पातूर तालुक्यात पळसखेड येथे लक्ष्मीबाई चव्हाण या महिलेचा मृत्यू झाला. आंबा, केळी, संत्रा, लिंबू, पपई, हळद, गहू व भाजीपाला पिकांनाही फटका बसला आहे. जळगावसह खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी मध्यरात्रीदेखील पूर्वमोसमी वादळी पावसासह गारपीटही अनेक भागात झाली, कांदा, डाळिंब बांगांना फटका बसला आहे. तसेच साक्री, शिरपूर (जि. धुळे) भागात शेडनेट, पॉलिहाउसचे मोठे नुकसान झाले. जुनी सांगवी (ता. शिरपूर) येथे वीज कोसळून येथील प्रल्हाद बाजीराव कोकणी यांचे दोन बैल मृत्युमुखी पडले.    नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दुसऱ्या दिवशी वादळी, वारे, विजांच्या कडकडात पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यतील वीज कोसळून एका महिलेसह दोन ठार, तर दोन जखमी झाले. वादळी वारे, पावसामुळे हळद, फळपिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी चिंतित आहेत. कंधार तालुक्यातील बोरी खुर्द येथे विज कोसळून अनिता व्यंकटी केंद्रे यांचा, तर देविदास गणेश उपाडे यांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यतील परभणी, मानवत, पूर्णा,जिंतूर, सेलू, वसमत, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे वाळवत ठेवलेली केळी, हळद, आंबा, लिंबू, टरबूज पिकांचे नुकसान झाले.  नाशिक जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी पावसाने हजेरी लावली. बागलाण, देवळा व दिंडोरी तालुक्यांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर पशुधनाचे व शेतीमालाचेही नुकसान झाले. दुष्काळासह वादळी पावसामुळे दुहेरी सकंट ओढवल्याने शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मंगळवारी (ता. १६) जिल्ह्यातील मालेगाव, दिंडोरी, बागलाण, कळवण, सिन्नर तालुक्यांत अवकाळी पाउस झाला. दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे संपत उदार या वृद्धाचा, बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे योेगेश बापू शिंदे तरुणाचा, तर देवळा तालुक्यातील वाजगाव येथेही हौसाबाई कुंवर या महिलेचा मृत्यू झाला. त्यांच्या जवळ असलेली शेळीदेखील दगावली. कळवण तालुक्यातील मौजे बिजोरे येथील शेतकरी विलास बबन वाघ यांच्या म्हशीचाही मृत्यू झाला. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात पुन्हा झालेल्या गारपिटीने टरबूज, डाळिंब यांचे मोठे नुकसान झाले. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात असलेल्या जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यांत दोन-तीन दिवसांपासून सातत्याने वादळी पाऊस पडत आहे. मंगळवारी (ता. १६) सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा, गारपिटीसह झालेल्या वादळी पावसाने उन्हाळी पिकांना फटका बसला आहे. जुन्नर तालुक्यातील येडगाव-भोरवाडी येथील गोठ्यावर वीज पडून शेतकरी महेश दत्तात्रेय भोर यांचा, तर चिंचोशी (ता. खेड) येथे हरिदास गोकुळे या शेतकऱ्याचा वीज अंगावर पडून मृत्यू झाला. कलिंगड, चिकू, केळी, गहू, कडवळ, डाळिंब आदी पिकांना फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com