हिंगोली ः सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे; तसेच वाढत्या तापमानामुळे यंदा हिंगोली जिल्ह्यात पूर्वमोसमी हळद लागवड क्षेत्रात घट होणार आहे. जून महिन्यात मोठ्या प्रमाणावर लागवड होऊन यंदा हळदीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कमी खर्चात किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांतील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील हळदीचे क्षेत्र २५ हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे. काही वर्षांपूर्वी केळी पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या वसमत तालुक्यातील शेतकरी केळी, ऊस या पिकांच्या तुलनेत कमी पाणी लागणाऱ्या हळद पीक लागवडीकडे वळले आहेत.
सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी दरवर्षी मे महिन्यात हळद लागवडीस सुरवात करतात; परंतु जून महिन्यात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला.
सिद्धेश्वर धरणासह अनेक लघुतलाव भरले नव्हते. सध्या अनेक प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. विहिरी, बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नाही; तसेच तापमानात मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे यंदा मे महिन्यात पूर्वमोसमी हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमीच राहणार आहे. लागवडीयोग्य पाऊस झाल्यानंतर जून महिन्यात मोठ्या प्रमाणात हळद लागवड केली जाईल. सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, तूर आदी पिकांच्या उत्पादनात विविध कारणांनी घट येत आहे. त्यामुळे यंदा हळद लागवडीच्या क्षेत्रात २० ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.