अमरावतीत संत्रा पोचला प्रतिटन ४० हजारांवर

फळगळीमुळे संत्री उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. ११०० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे संत्री उत्पादकांना हेक्‍टरी ५० हजार रुपयांची मदत दिली जावी, अशी मागणी आहे. - रमेश जिचकार, कार्यकारी संचालक, संत्री उत्पादक संघ
संत्रा
संत्रा

अमरावती ः तापमानात झालेली वाढ, अत्यल्प पाऊस, त्यासोबतच बुरशीजन्य रोग, यामुळे झालेली फळगळ; त्यामुळे बाजारात संत्री दरात चांगलीच तेजी आली आहे. ३५ ते ४० हजार रुपये प्रति टनाप्रमाणे संत्र्याचे व्यवहार होत असून, येत्या काळात पांढूर्णा, जरुड, हिवरखेड परिसरातील संत्र्याला ५० हजार रुपये प्रति टनाचे दर मिळतील, अशी शक्‍यता महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे यांनी व्यक्‍त केली.  अमरावती जिल्ह्यात ८६ हजार हेक्‍टरच्या आसपास संत्री लागवड आहे. त्यातील सुमारे ५५ ते ६० हजार हेक्‍टर उत्पादनक्षम आहे. यातील ३० ते ३५ हजार हेक्‍टर क्षेत्रातून मृग तर २५ ते ३० हजार हेक्‍टरमध्ये आंबीया बहारातील फळांचे उत्पादन घेतले जाते. पूर्वी मृग बहारातील संत्री घेण्यावरच ९० शेतकऱ्यांचा भर राहत होता. उन्हाळ्यात ही फळे बाजारात येत, त्यामुळे त्यामध्ये गोडवा अधिक राहत होता. परंतु नजीकच्या काळात मृग ६० टक्‍के तर आंबीया बहारातील फळे ४० टक्‍के शेतकरी घेतात. यावर्षी संत्री उत्पादकांना वातावरणातील बदलाचा मोठा फटका बसला. पावसातील खंड, त्यामुळे वाढलेले तापमान तसेच अल्टर्नेरिया व डिप्लोडिया या बुरशीचा प्रादुर्भाव होऊन संत्र्याची फळगळ झाली. बाजारात मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याने दरात तेजी येत ३५ ते ४० हजार रुपये प्रति टनावर संत्र्याचे दर पोचले आहेत. गेल्या काही वर्षातील सर्वात उच्चांकी दर असल्याने संत्री उत्पादकांमध्येदेखील समाधान व्यक्‍त होत आहे. 

दर पोचतील ५० हजार प्रतिटनावर  आंबीया बहारातील या संत्र्याचा कडकपणा डिसेंबरपर्यंत राहतो. त्यानंतर पांढूर्णा (मध्य प्रदेश),  हिवरखेड, जरुड भागातील संत्र्याला कडकपणा मिळतो. त्यामुळे १५ डिसेंबरअखेर बाजारात येणाऱ्या या संत्र्याला ५० हजार रुपये प्रति टनाचा दर मिळेल, अशी शक्‍यता श्रीधर ठाकरे व्यक्‍त करतात. हैदराबाद, बंगलौर, केरळ, जम्मू काश्‍मीर, सिलीगुडी, दिल्ली या भागात संत्र्याला सर्वाधिक मागणी आहे. प्रतिक्रिया वातावरणातील बदलामुळे या वर्षी ६० टक्‍के फळगळ झाली. त्यामुळे बाजारात संत्री कमी आणि मागणी जास्त. यामुळे दर तेजीत आले आहेत. २०१५-१६ या वर्षात चार हजार ते १६ हजार रुपये प्रति टन असा दर होता. यावर्षी ३५ ते ४० हजारावर दर पोचले. आंबीया १५ सप्टेंबर ते डिसेंबरपर्यंत राहतो. जानेवारीपासून मृगाची संत्री बाजारात राहतात, ती दहा एप्रिलपर्यंत मिळतात.  - श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाऑरेंज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com