बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी लागेल ः शरद पवार

जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून, त्याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना सोसावी लागत आहे. -शरद पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी लागेल ः शरद पवार
बाजार समित्या रद्द केल्यास किंमत मोजावी लागेल ः शरद पवार

मुंबई ः सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार समित्या कशाला ठेवायच्या, असा प्रश्न काही लोक उपस्थित करत आहेत. बाजार समित्या जर रद्द केल्या, तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागेल, असा इशारा माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी (ता. २५) दिला.

स्व. अण्णासाहेब पाटील यांची ८४ वी जयंती आणि माथाडी कामगारांचा मेळावा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार विजय सावंत, गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख आदी कामगार नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमासाठी अनुपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांची एक संघटना बांधली, त्या संघटनेचे एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. तसेच, त्यांनी माथाडी कामगारांसाठी अनेक योजना आणल्या.’’ सध्याच्या परिस्थितीत माथाडी कामगारांसाठी अडचणीचा काळ असल्याचे सांगत पवार म्हणाले, ‘‘सरकारची धोरणे रोज बदलत आहेत. बाजार समित्या कशाला ठेवायच्या, असा प्रश्न काहींनी उपस्थित केला होता.

बाजार समित्या जर रद्द केल्या, तर त्याची जबरदस्त किंमत आपल्याला मोजावी लागेल. कामगारांसाठी अनेक बोर्ड आहेत, ज्यांवर अद्यापही अध्यक्षांची नेमणूक झालेली नाही. कामगारांची कामे होत नाहीत. जर मुख्यमंत्री आजच्या मेळाव्यात उपस्थित असते, तर त्यांच्यासमोर कामगारांचे प्रश्न मांडले असते. मात्र, मुख्यमंत्र्यांची स्वतंत्र वेळ घेऊन माथाडींचे प्रश्न मांडण्यात येतील.

नाशिक येथे माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न येत्या काळात चर्चा करून मार्गी लावू. राज्यात असुरक्षित कामगारांची संख्या वाढत चालली आहे, ही गंभीर बाब असल्याचे नमूद करत पवार म्हणाले, ‘‘कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढत आहे. सरकार त्यांना कोणतेही संरक्षण देत नाही. कंत्राटी कामगार सुरक्षित नाहीत हे चांगले नाही.

देशात दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. जगात पेट्रोल व डिझेलचे दर कमी होत असताना देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे महागाई वाढत असून, त्याची झळ सर्वसामान्य कुटुंबांना सोसावी लागत आहे.’’ याचा आपण विचार करायला हवा, जागरूक व्हायला हवे, असेही श्री. पवार म्हणाले.

या वेळी गुणवंत कामगारांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com