उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना मनस्ताप

उत्पादकता निकषामुळे तूर उत्पादकांना मनस्ताप

नगर ः आधारभूत किमतीने तुरीची खरेदी करण्यासाठी शासनाने नाफेडमार्फत सरकारी खरेदी केंद्र सुरू केले खरे, मात्र खरेदीसाठी उत्पादकतेच्या निकषामुळे जास्तीची तूर बाजारात कमी दराने विकावी लागत आहे. राज्यातील बहूतांश जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना उत्पादकतेच्या निकषामुळे अर्ध्यापेक्षा अधिक तूर बाजारात कमी दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे खरेदी केंद्रे सुरू करूनही तूर खरेदीचा बोजवारा उडाला असल्याची स्थिती आहे. तूर विक्रीसाठी घातलेल्या उत्पादकतेच्या अटीमुळे अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  आधारभूत किंमतीने तूर खरेदीसाठी ‘नाफेड’मार्फत शासनाने खरेदी केंद्रे सुरू केले. ही केंद्रे सुरळीत चालण्याची जबाबदारी जिल्हा मार्केटींग फेडरेशनकडे आहे. गतवर्षी तूर विक्री करताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. त्याचा आर्थिक फटकाही शेतकऱ्यांना सोसावा लागला. यामुळे यंदा शेतकऱ्यांकडून तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र प्रत्यक्ष तूर विक्रीसाठी शेतकरी केंद्रावर आल्यानंतर मात्र उत्पादकतेची अट लावल्याची बाब समोर आली.  नगर जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीच्या १७५ टक्के तुरीचे क्षेत्र होते. जिल्ह्यामध्ये सरासरी ८६५ किलो हेक्‍टर उत्पादन झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. त्यानुसार सातबारा उताऱ्यावर तूर पेरीची नोंद असलेल्या एका शेतकऱ्यांकडून हेक्‍टरी अकरा क्विंटल २२ किलो खरेदी केंद्रावर तूर  खरेदी केली जात आहे. मात्र यावर्षी जिरायती भागात एकरी पाच क्विंटल तर बागायती भागात एकरी बारा क्विंटल उत्पादनानुसार सरासरी हेक्‍टरी पंचवीस क्विंटल उत्पादन झालेले आहे. उत्पादकतेच्या निकषानुसार मात्र अकरा क्‍विंटल २२ किलो नुसारच खरेदी सुरू आहे. त्यामुळे बहूतांश शेतकऱ्यांना पन्नास टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त तूर बाजारात विक्री करावी लागली आहे.  नगर बाजारात एकाही व्यापाऱ्याने पाच हजार पन्नास रुपये आधारभूत किमतीने खरेदी केलेली नाही. सध्याही बाजारात व्यापारी तुरीची ३६०० ते ३८०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी करतात. त्यामुळे केवळ उत्पादकतेच्या निकषाने सरकारी खरेदी केंद्रावर तूर विक्री करता आली नसल्याने प्रती क्विंटल १२०० ते १३०० रुपयांचा फटका सोसावा लागला आहे. एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर जवळपास साडेचार लाख क्विंटल तूर बाजारात आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने विकावी लागणार असल्याने साडेचार ते पाच कोटी रुपयाचा फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.  नगर जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या उत्पादकता अहवालानुसार एक लाख ८२ हजार ०४७ क्विंटल तूर उत्पादन होईल. मात्र प्रत्यक्षात जवळपास साडे पाच लाख क्‍विंटल तुरीचे उत्पादन झाल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दहा तूर खरेदी केंद्रावर आतापर्यंत ४९ हजार ९२९ क्विंटल खरेदी झाली. म्हणजे सरकारी उत्पादनानुसार फक्त पंचवीस टक्के खरेदी झाल्याचे स्पष्ट होते. मात्र आतापर्यंत जवळपास दोन लाख क्विंटल तुरीची बाजारात आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने विक्री झाल्याचे उघड झाले आहे. प्रत्यक्ष उत्पादनाचा विचार केला तर जवळपास साडेचार लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर बाजारात विकावी लागणार आहे. त्यामुळे सरकारी खरेदी केंद्रे सुरू असूनही जवळपास पाच कोटींपेक्षा अधिक आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे.

हरभरा विक्रीतही मनस्ताप हरभऱ्यांच्या क्षेत्रानेही यंदा सरासरी ओलांडली. अजून खरेदी केंद्रे अनेक ठिकाणी प्रत्यक्षात सुरू झालेले नाहीत. मात्र हेक्‍टरी १० क्विंटलप्रमाणे खरेदी करण्याच्या सूचना असल्याचे मार्केटींग फेडरेशनकडून सांगण्यात आले. जिल्ह्यामध्ये उच्चत्तम १२ क्विंटल १० किलो हेक्‍टरी उत्पादन निघाले असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. प्रत्यक्षात हेक्‍टरी अठरा ते वीस क्विंटल उत्पादन निघाल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे हरभरा विक्रीतही शेतकऱ्यांना मनस्तापच सहन करावा लागणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com