ऊस पेमेंटपोटी साखर देण्याचा प्रस्ताव 

खासदार राजु शेट्टी यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले.
खासदार राजु शेट्टी यांनी साखर आयुक्तांना निवेदन दिले.

पुणे  : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी द्यावी किंवा पूर्ण पेमेंट देणे शक्य नसल्यास थकीत रकमेइतकी साखर शेतकऱ्यांना द्यावी, असा तोडगा काढण्याचे प्रयत्न साखर आयुक्तालयाकडून सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अनेक कारखान्यांनीदेखील या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली आहे.  

राज्यात साडेचार हजार कोटींची एफआरपी थकल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी सोमवारी (ता.१४) तासभर चर्चा केली. थकलेल्या पेमेंटपोटी कारखान्यांनी साखर देण्याचा तोडगा आयुक्तांकडूनच आधी चर्चेला आला होता. त्याला दुजोरा देत कारखान्यांनी शेतकऱ्यांना साखर दिल्यास स्वीकारली जाईल, असे ‘स्वाभिमानी’ने देखील मान्य केले आहे. 

‘‘शेतक-यांची एफआरपी थकविणा-या साखर कारखान्यांची साखर जप्त करून लिलाव करावेत. तुम्ही लिलाव केल्यास प्रतिक्विंटल २९०० रुपये दराने साखर स्वीकारण्यास शेतकरी तयार आहेत,’’ असे पत्रच खासदार शेट्टी यांनी आयुक्तांना दिले.

‘‘७० दिवसांनंतर देखील राज्यातील अनेक कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. कायद्यानुसार १४ दिवसांत एफआरपी द्यावी लागते. कारखानदारांनी कायदा मोडला आहे. आयुक्तांनी काढलेल्या कारवाईच्या आदेशालाही कारखान्यांनी केराची टोपली दाखविली आहे’’, असे खासदार शेट्टी यांनी स्पष्ट केले.

‘‘काही कारखान्यांनी मोडतोड करून पेमेंट जमा केले आहे. मात्र, एकरकमी पेमेंट न करणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करून लिलाव करावेत. त्यातून शेतक-यांच्या खात्यात पैसे भरावेत किंवा तेव्हढ्याच रकमेची साखर शेतक-यांना द्यावी. तुम्ही याबाबत कार्यवाही करा. अन्यथा शेतक-यांच्या नुकसानीला जबाबदार राहाल, असा इशाराही खासदार शेट्टी यांनी दिला. 

या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना खासदार शेट्टी म्हणाले, की अनेक कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी पेमेंट केले आहे. कमी दिलेल्या रकमेच्या मूल्याइतकी साखर शेतकरी स्वीकारतील. साखर आयुक्तांनी या प्रस्तावाला तत्त्वतः मान्यता दिली आहे.  शेतक-याला त्यामुळे ८ ते १९ किलो दरम्यान साखर मिळेल. ताब्यात आलेल्या साखरेची विल्हेवाट कशी लावायची तो आमचा प्रश्न आहे.

साखर विकली जात नाही म्हणून पेमेंट करता येत नाही, असे कारखानदार सांगतात. मात्र, काही कारखान्यांनी साखर विकून देखील पेमेंट केलेले नाही. ही फसवणूक आहे. तयार साखर जाते कुठे, असा सवाल त्यांनी केला. थकीत एफआरपीसाठी आधी ठरल्याप्रमाणे २८ जानेवारीला साखर आयुक्तालयावर मोर्चा काढणारच, असा पुनरुच्चार खासदार शेट्टी यांनी केला.  

‘एफआरपीचे तुकडे करण्यात रस नाही’ एफआरपीबाबत तुमच्याशी चर्चा करणार असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी जाहीर केले आहे, असे पत्रकारांनी सांगितले असता खासदार शेट्टी म्हणाले, की आम्ही सांगितलेल्या पद्धतीने चर्चा करण्यास मला आवडेल; पण एफआरपीचे तुकडे करणा-या चर्चेत मला रस नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com