जळगाव ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७) फक्त एकच कडधान्य खरेदी केंद्र अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरू झाले आहे. त्यातही केवळ ३८.५० क्विंटल मुगाची खरेदी हमीभावानुसार झाली असून, खराब दर्जाच्या कारणामुळे चार मूग उत्पादकांना परत पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात १५ तालुके असताना केवळ पाचोरा, जळगाव व अमळनेर येथे शासकीय कडधान्य खरेदी केंद्र नाफेडची नोडल संस्था म्हणून मार्केटिंग फेडरेशनने प्रस्तावित केले असून, यातील केवळ अमळनेर येथील केंद्र सुरू होऊ शकले आहे. जळगाव व पाचोरा येथील केंद्र सुरू करण्याचा मुहूर्त अजून निघालेला नाही.
मूग, उडीद किंवा इतर कोणतेही कडधान्य शासकीय खरेदी केंद्रात शेतकऱ्यांना विक्री करायचे असेल तर संबंधित पिकाची नोंद उताऱ्यावर असणे बंधनकारक आहे. तसेच यासंबंधीची नोंदणी खरेदी केंद्रात ऑनलाइन करावी लागेल. आधार कार्ड, बॅंकेचा खाते क्रमांकही द्यायचा आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी आपल्या उताऱ्यावर उडीद, मूग व इतर तृणधान्यवर्गीय पिकांच्या नोंदी केलेल्या नाहीत.
उताऱ्यावर संबंधित पिकाची नोंद नसली तर शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करता येणार नाही, असे निर्देश मार्केटिंग फेडरेशनने जारी केले आहेत. या आदेशामुळे संबंधित पिकाची नोंद नसलेल्या शेतकऱ्यांसमोर अडचण उभी राहिली आहे.
जिल्ह्यात अद्याप सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे की नाही याचे स्पष्टीकरण जिल्हा प्रशासनाने दिलेले नाही. परंतु लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी २१ तृणधान्य खरेदी केंद्रे सुरू झाली होती. पैकी अमळनेर, एरंडोल, जामनेर व पाचोरा येथे खरेदी झाली होती. ही बाब लक्षात घेता यंदा मार्केटिंग फेडरेशनने जेथे खरेदी केंद्राची गरज आहे तेथेच केंद्र सुरू करा. मागील वर्षातील बाबी लक्षात घेतल्या जाव्यात, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तृणधान्य खरेदी केंद्र सुरू करण्याची तयारी मार्केटिंग फेडरेशनने केली आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. हे केंद्र नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.