हमीभावाने खरेदीत अनियमितता झालेल्या बुलडाण्यातील संस्था काळ्या यादीत

खरेदी केंद्रांची नावे अंतिम झालेली अाहे. जिल्ह्यात १३ केंद्र मंजूर झाले अाहेत. गेल्या वेळी काम समाधानकारक नसल्याने बुलडाणा, सिंदखेडराजा, मेहकर, शेगाव, संग्रामपूर येथील संस्था काळया यादीत टाकल्या अाहेत. खरेदीच्या दृष्टीने शेगाव, संग्रामपूर येथे दुसऱ्या संस्थांकडून अद्यापपर्यंत प्रस्ताव मिळालेला नाही. - पी. एस. शिंगणे, जिल्हा पणन अधिकारी, बुलडाणा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

बुलडाणा  ः गेल्या हंगामात मूग, उडीद, सोयाबीन, तूर खरेदीमध्ये अनियमितता समोर अालेल्या केंद्रचालक संस्थांना या वेळी डच्चू दिला जात अाहे.  या खरेदीदार संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात अाल्याने त्यांचा या वेळी खरेदी प्रक्रियेतील सहभाग संपुष्टात अाला अाहे. बुलडाणा जिल्ह्यात पाच ठिकाणी असा गोंधळ झाला असून तेथे पर्यायी संस्थांच्या माध्यमातून यंदा हमीभाव खरेदी केंद्र चालविले जाणार अाहे. मात्र शेगाव व संग्रामपूर या दोन ठिकाणी पर्यायी संस्थांचे अर्जच नसल्याने केंद्र सुरू करण्याबाबत गोंधळाची स्थिती निर्माण झाली अाहे.  

बाजारात शेतीमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासन हमीभावाने खरेदी करीत असते. बहुतांश ठिकाणी तालुकास्तरावर खरेदी विक्री संस्थांच्या माध्यमातून हे काम आतापर्यंत करण्यात अाले. मात्र अनेक ठिकाणी गोंधळ होऊन शासनाची बदनामी झाली. त्यामुळेच या वेळी केंद्र देताना अनेक निकष लावण्यात अाले अाहेत. मागील हंगामात ज्या केंद्राच्या ठिकाणी खरेदीत अनियमितता, माहिती वेळेत सादर न करणे तसेच इतर कारणांनी खरेदी केंद्र चर्चेत आले अशा संस्थांना प्रशासनाने काळ्या यादीत टाकण्याचे धाडसी पाऊल उचलेले अाहे.

त्यामुळे यावर्षीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा, संग्रामपूर अाणि शेगाव येथे गेल्या हंगामात खरेदी प्रक्रियेत असलेल्या संस्था वगळून पर्यायी संस्थांच्या माध्यमातून केंद्र सुरू करण्याची तयारी आहे. मेहकर, बुलडाणा, सिंदखेडराजा या ठिकाणी पर्याय उपलब्ध झाला. मात्र शेगाव, संग्रामपूर या ठिकाणी खरेदीसाठी कोणत्याही संस्थेचा प्रस्ताव अद्यापपर्यंत न मिळाल्याने खरेदी केंद्र सुरू होण्यात अडचणी तयार झाल्या अाहेत. शासनाने मूग, उडीद खरेदीसाठी १५ अाॅक्टोबरपर्यंत अाॅनलाइन नोंदणी करण्याचे शेतकऱ्यांना अावाहन केलेले अाहे. शिवाय खरेदीसाठी नव्या निकषांनुसार केंद्रांची नावे अंतिम करण्यात अाली अाहेत. खरेदी केंद्रांमधून संग्रामपूर, शेगांवसह पाच तालुके वगळून शेतकऱ्यांवर शासनाने अन्याय केला आहे. हा दुजाभाव दूर करून संग्रामपूर आणि शेगांव येथील खरेदी केंद्रांना शासनाने मान्यता द्यावी अन्यथा शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करू. शेगांव, संग्रामपूर परिसरात सोयाबीन, मूग व उडिदाचा पेरा मोठ्या प्रमाणात झालेला असून शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे, असे जळगाव जामोद बाजारसमितीचे सभापती  प्रसेनजित पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com