जळगाव : जिल्ह्यात हरभऱ्याच्या पेरणीला वेग येत आहे. आजघडीला एकूण २९ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, हरभऱ्यासह इतर रब्बी पिकांची मिळून एक लाख सहा हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुढील आठवड्यात पेरणीला आणखी वेग येणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात एक लाख ८४ हजार हेक्टरवर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी होईल, असे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यादृष्टीने खते, बियाणे यासंबंधीची व्यवस्था शासकीय संस्थांच्या मदतीने करण्यात आली. यात हरभऱ्याचे बियाणे अधिकचे मागविण्यात आले. कारण जिल्ह्यात हरभऱ्याची पेरणी पाच हजार हेक्टर अधिक होईल, अशी शक्यता आहे. हरभऱ्याची इतर पिकांच्या तुलनेत सर्वाधिक ७५ हजार हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज आहे. ज्वारीची ३३ हजार हेक्टरवर पेरणी होईल. गव्हाच्या २८ हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे.
जिल्ह्यात दसरा सणानंतर झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले. दिवाळीनंतर थंडीही वाढू लागली. ज्या शेतकऱ्यांना हरभरा, दादर (ज्वारी) पेरणीबाबत फारसा आशावाद नव्हता त्यांच्या आशा परतीच्या पावसामुळे पल्लवीत झाल्या. परिणामी हरभरा व दादरची पेरणी दिवाळीपूर्वी व दिवाळीनंतर वेगात सुरू होती.
हरभऱ्यानंतर दादरचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर गव्हाचे क्षेत्र असून, हवे तसे पाणीसाठा नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी हरभरा पेरणीवर भर दिलेला दिसतो. जिल्ह्यात काळीकसदार जमीन असलेल्या भागात हरभऱ्याची पेरणी जोमात सुरू आहे. रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर, अमळनेरच्या तापीकाठावरील भागात दादर, हरभरा पेरणी पूर्ण होत आली आहे. काही ठिकाणी हरभरा पेरणी अजूनही सुरू आहे. गव्हाची पेरणीदेखील सुरू झाली आहे.
जिल्ह्यात गव्हाच्या तुलनेत मक्याचे क्षेत्रही वाढू लागले आहे. त्याची जिल्हाभरात जवळपास २१ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. रावेर, यावल, मुक्ताईनगर भागातील अनेक शेतकऱ्यांनी तर सूक्ष्म सिंचनावर मका लागवड केली आहे. जुनारी केळी, कडधान्य व तृणधान्य पिकांमधून रिकाम्या झालेल्या क्षेत्रात लागवड सुरू आहे. मका लागवड अगदी फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यात सुरू राहील.