पुणे : राज्यात रब्बी पिकांचा पेरा आतापर्यंत ५२ टक्क्यांपर्यंत गेला आहे. बेमोसमी पावसामुळे ज्वारी व गव्हाला फायदा होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
रत्नागिरी, नाशिक, पुणे तसेच मराठवाड्यातील काही भागात बेमोसमी पाऊस झाला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ३.३ मिमी पावसाची नोंद झाली. राज्यात रब्बीची एकूण ५४.७५ लाख हेक्टरवर पेरणी होते. शुक्रवारपर्यंत (ता.१७) यापैकी २८.३५ लाख हेक्टरवर म्हणजे ५२ टक्के पेरणी झालेली आहे.
खरीप ज्वारी, बाजरी, सोयबीन, भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. तूर मात्र अनेक ठिकाणी वाढीच्या तसेच काही ठिकाणी फुलोरा ते शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. कापसाची वेचणी अजूनही सुरू आहे.
विविध रबी पिकांच्या पेऱ्याची स्थिती बघता सर्वात जास्त आघाडी हरभऱ्याने घेतली आहे. राज्यात १३ लाख हेक्टरवर हरभरा पीक घेतले जाते. गेल्या हंगामात याच कालावधीत साडे नऊ लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. हाच पेरा यंदा आतापर्यंत साडे दहा लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. रबी ज्वारीचा पेरा मात्र गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी दिसतो आहे. गेल्या हंगामात याच कालावधीत शेतकऱ्यांनी साडेसोळा लाख हेक्टरवर ज्वारीचा पेरा केला होता. यंदा मात्र आतापर्यंत साडेचौदा लाख हेक्टरच्या आसपास पेरा झालेला आहे.
कीडरोगाबाबत कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालात कपाशीवरील शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त असल्याचे म्हटले आहे. या जिल्ह्यातील २०५ गावांमध्ये या अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.
धुळे जिल्ह्यातील चार गावांमध्ये, नंदूरबारमधील दोन, तर जळगावमधील ९ गावांमध्ये कपाशीवर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येते. नगर जिल्ह्यातील ४५, जालन्यातील ७९, बीडमधील ७८, परभणीतील १२ आणि नांदेड जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये शेंदरी बोंडअळी आढळून आली आहे. तसेच हिंगोलीतील चार, अमरावतीतील ५८, वाशीममधील २५, अकोल्यातील १०१ गावांमध्ये शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.
या भागांमधील शेतकऱ्यांना कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून पीक संरक्षणासाठी सल्ला दिला जात असल्याचे आढळल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.