औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सर्वसाधारण ६ लाख ५२ हजार हेक्टरपैकी २ लाख ४१ हजार ३३१ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणीचा टक्का अजूनही ३७ टक्क्यांच्या पुढे सरकला नसून पेरणीची गती संथच आहे.
औरंगाबाद, जालना व बीड या तीनही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीला प्राधान्य दिले आहे. त्यापाठोपाठ रब्बी ज्वारी, मका आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. तीनही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीच्या सर्वसाधारण ३ लाख ९२ हजार ९६९ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ५५ हजार ३५६ हेक्टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या ३९ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारीची पेरणी झाली आहे. गव्हाच्या सर्वसाधारण १ लाख ९ हजार ७५८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत केवळ १० टक्के अर्थात ११ हजार ९३५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे.
तीनही जिल्ह्यांत रब्बी मक्याचे सर्वसाधरण क्षेत्र १२ हजार ४६३ हेक्टर असून, त्यातुलनेत ४७८२ हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १७ हजार ४२८ हेक्टर असून, इतर रब्बी पिकाच्या तुलनेत आजवर सर्वाधिक ५७ टक्के अर्थात ६७ हजार ३० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. रब्बी सूर्यफुलाचीही २२७४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली.
औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील सात तालुक्यांत हरभऱ्याची सर्वसाधारण क्षेत्राच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. यामध्ये सिल्लोड, जाफ्राबाद, बदनापूर, आष्टी, माजलगाव, अंबाजोगाई व केज या तालुक्यांचा समावेश आहे.