सांगली : जिल्ह्यात रब्बी पेरणीला वेग आला असून आत्तापर्यंत ४४ टक्के पेरणी झाली आहे. जत तालुक्यात ज्वारीची सर्वाधिक पेरणी झाली आहे. मात्र, तेलवर्गीय करडई, सूर्यफूल या पिकांच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र २ लाख ६६ हजार ९०७ हेक्टर आहे. त्यापैकी आजअखेर १ लाख १७ हजार ९६० हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला आहे. गेल्या महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांची काढणी उशिरा सुरू झाली. यामुळे रब्बीच्या पेरण्यादेखील उशिरा प्रारंभ झाला. वाळवा, पलूस तालुक्यात सोयाबीनची काढणी सुरू आहे. शिराळा तालुक्यात भाताची अद्यापही काढणी सुरू झालेली नाही. त्यामुळे या तिन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरवात केली नसल्याचे चित्र आहे. येत्या चार दिवसांत उर्वरित सोयाबीनची काढणी पूर्ण होईल त्यानंतर रब्बी पिकांच्या पेरणीला अधिक गती येईल.