सातारा ः जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १०१.२५ टक्के क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणीची झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणी माण तालुक्यात झाली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
रब्बी हंगामात पेरणीच्या सुरवातीपासून पोषक वातावरण राहिले. परिणामी, पेरणीची कामे वेळेत सुरू झाली. जिल्ह्यात रब्बी पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १५ हजार १३५ हेक्टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) दोन लाख १७ हजार ८२३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. माण तालुक्यात सर्वाधिक ४३ हजार ७३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र एक लाख ३५ हजार ७४५ हेक्टर असून, त्यापैकी एक लाख ३७ हजार ४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
हरभऱ्याचे दर कमी-अधिक प्रमाणात स्थिर राहिल्याने हरभरा पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. हरभऱ्याचे २९ हजार १८७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ३० हजार ३ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. मक्याचे सात हजार ८३५ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, मक्याची १२ हजार ६०५ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गव्हाचे ३८ हजार ३९७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, त्यापैकी ३७ हजार १३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जिल्ह्यात २५ हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावर सुरू हंगामातील उसाची लागवड झाली आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक सहा हजार १५ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. हरभरा, रब्बी ज्वारीची अवस्था चांगली असल्याने या हंगामात उत्पादन चांगले होईल, असा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्टर) ः सातारा २०,५३६, जावली ९७१९, पाटण १२,४५३,कऱ्हाड १४,९१५, कोरेगाव २२,५४२,खटाव २७,८३५,माण ४३,७३०, फलटण ३४,३३४,खंडाळा १६,६८०, वाई १४,३१९,महाबळेश्वर ७६०.