अकोला ः विविध कारणांनी रखडलेला रब्बी हंगाम अखेर लक्ष्यांकाच्या अातच थांबल्याचे चित्र अाहे. वऱ्हाडातील तीनपैकी एकाही जिल्हयात या रब्बीत १०० टक्के क्षेत्र लागवडी खाली येऊ शकलेले नाही.
अकोला जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघी ४७.५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. यापाठोपाठ वाशीममध्ये ५१.६ अाणि बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ८८.७ टक्के पेरणी झाली आहे. खरिपात पिकांनी पाठ फिरवल्याने रब्बीत लागवड वाढेल असा अंदाज होता. त्यातच अाॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसानेही अपेक्षा वाढविल्या. मात्र शेतकऱ्यांनी रब्बी लागवडीकडे पाठ फिरवल्याचे अाता स्पष्ट होत अाहे.
अकोला जिल्ह्यात सरासरी एक लाख २५२० हेक्टरच्या तुलनेत अवघी ४८ हजार ७४७ हेक्टरवर पेरणी झाली. त्यातही सर्वाधिक ४६ हजार ३५९ हेक्टर क्षेत्र हे हरभऱ्याचे अाहे. त्यानंतर गव्हाची लागवड १७७३ हेक्टरवर झाली. वाशीम जिल्हयातही काहीशी अशीच परिस्थिती अाहे. वाशीममध्ये हरभऱ्याची ३७ हजार १११ तर गव्हाची ६१३० हेक्टरवर पेरणी झाली. या जिल्ह्याचे सरासरी लागवड क्षेत्र ८५ हजार ३२० हेक्टर असताना ४३ हजार ७५१ हेक्टरवर पेरणी झाली. सरासरी क्षेत्राच्या अवघी ५१.३ टक्के ही पेरणी अाहे.
वऱ्हाडातील अकोला, वाशीमच्या तुलनेत अाकाराने मोठा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात एक लाख १९ हजार १०० हेक्टरवर पेरणी झाली आहे. तरीही सरासरी क्षेत्राच्या ८८.७ टक्केच क्षेत्रावर पेरणी होऊ शकलेली अाहे. या जिल्ह्यात सर्वाधिक ९१ हजार १३६ हेक्टरवर हरभरा पेरण्यात अाला. १५,५०० हेक्टरवर गहू तर ९४१२ हेक्टरवर ज्वारी लागवड झाली अाहे. तीन हजार हेक्टरपर्यंत मक्याचीसुद्धा शेतकऱ्यांनी पेरणी केली.