देशात रब्बीची पेरणी ३८ लाख हेक्टरवर

पेरणी
पेरणी

नवी दिल्ली ः भारतातील बऱ्याच भागांत परतीच्या मॉन्सूनने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे रब्बी पेरणीला पोषक स्थिती असून पेरणीच्या कामाने वेग घेतला आहे. मागील आठवड्यापर्यंत देशात रब्बीची ३८.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती, अशी माहिती केंद्रीय कृषी विभागाने दिली आहे.  देशात यंदा सरासरी ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. मात्र सरासरीच्या कमी ९५ टक्केच पाऊस झाला; परंतु सप्टेंबरचा शेवटचा आठवडा ते आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील अनेक भागा़ंत जोरदार पाऊस झाला. सुरवातीला ज्या भागात पावसाने दांडी मारली होती तेथेही नदी, नाले भरून वाहिले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीच्या आशा वाढल्या होत्या.     देशातील अनेक भागांत उशिरा झालेल्या पावसाने जमिनीतील ओलावा वाढला होता. पेरणीला पोषक वातारण असल्याने शेतकऱ्यांनी लागवडीची कामे फूर्ण केली. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. देशातील रब्बी पेरणी आॅक्टोबरमध्ये सुरू होते आणि फेब्रुवारीमध्ये पिकांची काढणी होते. यंदा पेरण्या वेळेवर सुरू झाल्याने उत्पानात वाढ होण्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. 

कडधान्य पेरणी आघाडीवर  कृषी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार देशात ३८.६ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक ११ लाख हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली. तेलबीयांची पेरणी ९ लाख हेक्टरवर; तर भाताची पेरणी ४ लाख ६० हजार हेक्टरवर झाली आहे. ज्वारी, बाजरी आणि रागीची ४ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा रब्बीच्या पेरण्या वेळेवर सुरू झाल्याने पेरणी क्षेत्र आणि उत्पादन वाढेल, असा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे. पाऊस रब्बीला पोषक ः पटनायक देशातील अनेक भागांत परतीचा जोरदार पाऊस झाला; तसेच काही भागांमध्ये उशिराचा पाऊस सुरू आहे. हा पाऊस रब्बी पिकांना पोषक ठरणार असून, त्यामुळे देशात रब्बी लागवड वाढण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय कृषी सचिव शोभना के. पटनायक यांनी सा़ंगितले. ‘‘देशात यंदा रब्बी हंगामात मागील वर्षापेक्षा जास्त उत्पादन होईल अशी आशा आहे. २०१६-१७ मध्ये देशात रब्बी हंगामात १३७.२ दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. उशिरा झालेल्या पावसाने पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने खरिपातील उत्पादनाचा आधी जाहीर केलेला अंदाज खरा ठरण्याची शक्यात कमी आहे. यंदा खरीप हंगामात १३४.६७ दशलाख टन अन्नधान्य उत्पाद होईल असा अंदाज आहे. मागील वर्षी २०१६-१७ च्या खरिपात विक्रमी १३८.५२ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. रब्बी हंगामात कडधान्यांची जास्तीत जास्त लागवड व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. जेणेकरून डाळी आयात करण्याची गरज भासणार नाही. मागील वर्षासारखी डाळींच्या किमतीत यंदा जास्त चढउतार होणार नाही. यंदा सरकारकडे कडधान्यांचा मुबलक साठा आहे,’’ असेही पटनायक म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com