मराठवाड्यात २३ लाख हेक्‍टरवर रब्बी प्रस्तावित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत २३ लाख ७० हजार १०० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार तर लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांतील १४ लाख ५७ हजार १०० हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे.

औरंगाबाद कृषी विभागांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ५२ हजार हेक्‍टर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत गतवर्षीच्या रब्बी हंगामात ७ लाख ९५ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती. दुसरीकडे लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र ११ लाख ४८ हजार ४३० हेक्‍टर आहे. त्या तुलनेत गतवर्षीच्या रब्बी हंगामात १२ लाख ९४ हजार ७४९ हेक्‍टरवर रब्बीची प्रत्यक्ष पेरणी झाली होती.

दरम्यान पाऊस आणि गतवर्षी झालेल्या प्रत्यक्ष पेरणीची आकडेवारी लक्षात घेता यंदा लातूर कृषी विभागाअंतर्गत पाचही जिल्ह्यांत १३ टक्‍के क्षेत्रवाढ गृहीत धरून यंदा १४ लाख ५७ हजार १०० हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित केली आहे. दुसरीकडे औरंगाबाद कृषी विभागाअंतर्गत तीनही जिल्ह्यांत रब्बी क्षेत्रात १४.८८ टक्‍के वाढ गृहीत धरून यंदा ९ लाख १३ हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात घट होण्याची शक्यता मराठवाड्यात यंदा प्रस्तावित एकूण रब्बी क्षेत्रात परभणी जिल्ह्यात वाढ होणे कृषी विभागाला अपेक्षित नाही. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास ४ टक्‍के घट येण्याची शक्‍यता कृषी विभागाला आहे. पावसाचा प्रदीर्घ खंड व पाणीसाठ्यांची अवस्था पाहून हे नियोजन लातूर कृषी विभागाकडून प्रस्तावित केले गेले आहे.

लातूर विभागात सरासरी ७२ टक्केच पाऊस लातूर कृषी विभागातील पाचही जिल्ह्यांत यंदा २५ सप्टेंबर अखेरपर्यंत अपेक्षित पर्जन्यमानाच्या सरासरी ७२ टक्‍केच पाऊस पडला. त्यामध्ये १८ जून ते २३ जुलै व २० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर असा एकूण ७३ दिवस पावसाचा खंड पडला होता. पडलेल्या पावसामध्ये विभागात सरासरी ३६ दिवसच पाऊस पडला. त्यामध्ये लातूर जिल्ह्यात ३५ दिवस, उस्मानाबाद जिल्ह्यात ३६ दिवस, नांदेड जिल्ह्यात ३९ दिवस, परभणी जिल्ह्यात ३१ दिवस तर हिंगोली जिल्ह्यात केवळ ३९ दिवस पाऊस पडला. याचा थेट परिणाम रब्बीच्या क्षेत्र नियोजनावर झाला आहे.  

जिल्हा  सरासरी क्षेत्र  प्रस्तावित क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
औरंगाबाद १ लाख ८९ हजार २ लाख १९ हजार
जालना  १ लाख ५३ हजार २ लाख ६५ हजार
बीड ३ लाख १० हजार ४ लाख २९ हजार
लातूर १ लाख ७१ हजार ३ लाख ३३ हजार
उस्मानाबाद ४ लाख ९ हजार ४ लाख ८३ हजार
नांदेड १ लाख ३३ हजार २ लाख २५ हजार
परभणी २ लाख ८८ हजार २ लाख ८८ हजार
हिंगोली १ लाख ४५ हजार १ लाख २७ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com