नगर जिल्ह्यात रब्बी पेरण्या लांबणीवर

कर्जत तालुक्‍यात पाऊस नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होण्याची शक्‍यता दिसत नाही. चाऱ्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे. जनावरे जगवणे शेतकऱ्यांना अवघड होणार आहे. शासनानेच आता दुष्काळ जाहीर करून उपाययोजना करण्याची गरज आहे. - मनोहर लाडाणे, डिकसळ, ता. कर्जत, जि. नगर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः जिल्ह्यामध्ये यंदा पुरेसा पाऊस नाही. परतीचा पाऊस ही गायब झाला, त्यामुळे जिल्ह्यामध्ये कुठेही रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. पाऊस नसल्याने पाणी उपलब्ध नाही, त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होतील की नाही, याची शाश्‍वती नाही. खरिपाची पिके वाया गेलीच, आता रब्बीत तर परिस्थिती अधिक गंभीर असेल हे स्पष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नगर जिल्ह्याने मागील दहा वर्षांच्या काळात दुष्काळाच्या गंभीर झळा सोसल्या आहेत. मागील दोन वर्षांत चांगल्या पावसामुळे स्थिती चांगली होती. आता यंदा पुन्हा परिस्थिती गंभीर झाली आहे. नगर जिल्ह्यामध्ये यंदा सुरवातीपासूनच पाऊस नाही. त्यामुळे सुरवातीलाच अल्प पावसावर खरीप पेरण्या कराव्या लागल्या. मात्र मध्यंतरीच्या काळात पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. मूग, उडीद, सोयाबीन व अन्य पिकांचे पन्नास टक्‍क्‍यांच्या जवळपास नुकसान झाले. खरीप तर गेला, किमान रब्बीत चांगली पिके येतील, अशी आशा असताना रब्बीची तर पेरणी होण्याचीही शक्‍यता नाही.

जिल्ह्यामध्ये सुरवातीपासून पाऊस नसल्याने नदी, नाले, तलाव, कोरडेठाक आहेत. विहिरींचीही पाणी पातळी वाढली नाही. परतीच्या पावसावरच रब्बीचे भवितव्य अवलंबून होते. मात्र, परतीचा पाऊस न पडताच गायब झाला. भंडारदरा, निळवंडे धरण भरलेले असले तरी मुळात फारसा पाणीसाठा झाला नाही. या धरणाच्या लाभक्षेत्रात काही प्रमाणात पाणी मिळेल, परंतु दुष्काळी भाग असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, नगर, शेवगाव, पाथर्डी तालुक्‍यांत परिस्थिती गंभीर असणार आहे. पाणीच नाही तर रब्बीची पेरणी कशी करायची याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी पाऊस येईल या आशेने शेवगाव तालुक्‍यातील काही भागात ज्वारीची पेरणी झाली होती. मात्र, तेही पेरलेले आता वाया गेले आहे. कृषी विभागाकडेही अजून रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्याची नोंद नाही. त्यामुळे यंदा रब्बीत पेरण्या होण्याची शक्‍यताच धुसर झाली आहे. प्रशासनाच्या अंदाजानुसार जिल्ह्यामधील चौदापैकी सुमारे बारा तालुके दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com