राहुरीत भरडधान्य संशोधनासाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ : राधामोहन सिंह

पुणे ः वॅमनिकॉमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पौष्टिक धान्य कार्यशाळेत माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह.
पुणे ः वॅमनिकॉमध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय पौष्टिक धान्य कार्यशाळेत माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करताना केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह.

पुणे : देशातील भरडधान्य उत्पादक शेतकऱ्यांना नवे संशोधन उपलब्ध करून देण्यासाठी राहुरीमध्ये नवे सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी केली. पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्था येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय पौष्टिक धान्य कार्यशाळेचे उद्‍घाटन करताना ते बोलत होते.   या वेळी व्यासपीठावर कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, ओडिशाचे प्रधान कृषी सचिव सौरभ गर्ग, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सहकारमंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रीय कोरडवाहू क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक दलवाई, केंद्रीय कृषी सहसचिव जे. पी. राजेंदर, निती आयोगाचे सल्लागार डॉ. जे. पी. मिश्रा, भारतीय भरडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. विलास टोणपी होते. 

‘‘ज्वारी, बाजरी, नागली या पौष्टिक भरडधान्यांच्या उत्पादनातून शेतकरी केवळ देशाला अन्नधान्यच नव्हे; तर पौष्टिक आहार पुरवून आरोग्याचीदेखील काळजी घेत आहेत. त्यामुळे या पिकांमध्ये अजून संशोधन होण्यासाठी राहुरीमध्ये सेंटर फॉर एक्सलन्स उघडले जाईल’’, असे श्री. सिंह म्हणाले.  ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या कृषी धोरणाला मोठी चालना दिली आहे. गेल्या चार वर्षांत दोन वेळा दुष्काळाशी सामना करूनदेखील स्वातंत्र्यानंतरचे सर्वांत जास्त अन्नधान्य उत्पादन गेल्या हंगामात झाले आहे. कडधान्याच्या चांगल्या उत्पादनानंतर भविष्यात तेलबिया उत्पादनात देशाला स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे’’, असे श्री. सिंह यांनी स्पष्ट केले.  शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान्याची खरेदी करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणली जात असून, खरेदीदेखील वाढविण्यात आलेली आहे. मात्र, पिढीजात भ्रष्टाचार करून देशातील शेतकऱ्यांचे हाल करणारे आता शेतीवर बोलत आहेत, अशी टीका कृषिमंत्र्यांनी केली. 

...म्हणून शेतकरी ऊस लावतात ः खोत  कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत या वेळी म्हणाले, की राज्यातील कोरडवाहू भागात ज्वारी, बाजरीचे ३०-४० टक्के उत्पादन पूर्वी घेतले जात होते. मात्र, पाण्याची सुविधा मिळताच शेतकरी ऊस लावतात. कारण, ज्वारी, बाजरीला भाव नसल्याने शेतकऱ्यांना उसाशिवाय पर्यायदेखील नसतो. तुम्ही ज्वारी, नागली, बाजरीला भाव दिल्यास शेतकरी पुन्हा या पिकांकडे वळू शकतात. ज्वारी के हुरडा को हिंदी मे क्या बोलता... केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी राष्ट्रीय पौष्टिक धान्य कार्यशाळेत मुद्दे सोडून राजकीय सभेप्रमाणे भाषण केल्यामुळे सभागृहात बहुतेक जण व्हॉटसअॅपवर होते. मात्र, सहकारमंत्र्यांनी आपल्या हिंदी भाषणातून कार्यशाळेत शेतकऱ्यांची व्यथा मांडली. ज्वारी के हुरडा को हिंदी मे क्या बोलता है, असा मार्मिक सवाल त्यांनी सभागृहात विचारला. मात्र, कोणालाही उत्तर देता आले नाही." आमच्या महाराष्ट्रातील उदार शेतकरी कष्टाने ज्वारी पिकवून हुरडा म्हणून त्याचा मेवा मोफत खाऊ घालतो. पौष्टिक हुरडा खाण्यास तुम्ही महाराष्ट्रात यावे, असेही आवाहन श्री. देशमुख यांनी केले.  हमीभाव खरेदीसाठी कायदा करा ः देशमुख  केंद्र सरकारने किमान हमीभाव जाहीर केल्यानंतर या पिकांची बाजारात कमी दराने खरेदी करून शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. हे थांबवण्यासाठी हमीभावाच्या खाली धान्याची खरेदी-विक्री न होण्यासाठी केंद्राने कायदा करावा, अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी या वेळी केली. शेतकरी वर्गाची बाजारपेठेत पिळवणूक होते आहे. त्याला कष्टाप्रमाणे भाव, प्रतिष्ठा दिली पाहिजे. देशातील शेतकऱ्यांनी फक्त एक वर्ष शेती बंद केली तरी आपले काय हाल होतील याचा विचार करा, असेही सहकारमंत्री म्हणाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com