सांगली : जिल्ह्यात जून ते सप्टेंबरअखेर ४४९.७ मिलिमीटर; तर ऑक्टोबरमध्ये पंधरा दिवसांत ११२.३ मिलिमीटर पाऊस झाला. ऑक्टोबरमध्ये पडलेला पाऊस २२६ टक्के एवढा आहे. ऑक्टोबर महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची मागील दहा वर्षांतील ही पहिलीच घटना आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव तालुक्यातही समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. जुलै, ऑगस्ट महिन्यात दुष्काळी तालुक्यांतील गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू होते.
चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यांतील शेतकऱ्यांनी पशुधनासह वाळवा, पलूस तालुक्याकडे स्थलांतर केले होते.
ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यातनंतर जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरअखेरपर्यंत चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विक्रमी पावसाने शेतकरी समाधानी आहेत.
मिरज तालुक्यात ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक २९६.७ टक्के, तर जत तालुक्यात २७३.५ टक्के पाऊस झाला आहे. आटपाडी, पलूस आणि शिराळा तालुक्यातच १०० ते १८३ टक्के पाऊस झाला असून उर्वरित तालुक्यात २०० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली आहे.
नदीकाठावरील पिकांचे नुकसान
ऑक्टोबर महिन्यात उष्णता असते; पण या वेळी याच महिन्यात सलग पंधरा दिवस पाऊस झाल्याने वातावरणात गारवा आहे. नदीकाठच्या भागातील सोयाबीन, भात, भुईमूग शेंगा काढणीचा हंगाम सुरू आहे. शेतात अजून पाणी साठून राहिले आहे. काढणीसाठी व्यक्तय येत आहे. परिणामी पाणी साठलेल्या शेतातील पिके कुजली आहेत.
दुष्काळग्रस्तांना दिलासा
जत, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, तलावात केवळ ३० ते ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे.
तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका | जून ते सप्टेंबर | ऑक्टोंबर |
मिरज | 409.8 | 163.8 |
जत | 397.3 | 119.8 |
खानापूर | 366.3 | 87.6 |
वाळवा | 479 | 128.9 |
तासगाव | 312 | 98.8 |
शिराळा | 853.8 | 96 |
आटपाडी | 381 | 70.4 |
कवठेमहांकाळ | 439.5 | 120.6 |
पलूस | 348.2 | 72.9 |
कडेगाव | 414.6 | 101.2 |