पावसाची दडी पिकाच्या मानगुटीवर

पावसाची दडी पिकाच्या मानगुटीवर
पावसाची दडी पिकाच्या मानगुटीवर

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बत्तीस टक्‍के पेरणी आटोपली. पाऊस येईल या आशेवर दुसऱ्या टप्प्यात शेतकऱ्यांनी पेरणीची गती वाढविली. परंतु अंदाज चुकविणाऱ्या पावसाने पुन्हा एकदा घात करण्याचेच काम केले आहे. कुठे आठ दिवस, कुठे पंधरवडा लोटूनही पाऊस नसल्याने पेरणी केलेल्या व पेरणी राहिलेल्या साऱ्यांच्याच नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत चिंतेचे ढग अधिक गडद झाले आहे.  

औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील थोडा भाग वगळता जवळपास सर्वच भागांत पावसाने पंधरवड्यापासून ओढ दिल्याची स्थिती आहे. मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातही तुरळक अपवाद वगळता पावसाने आठवडाभरापासून दडी मारली आहे. २५ जूनच्या आसपास पेरणी झालेल्या लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील पिकांनी अजून जमीन सोडली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील मुर्शीदाबाद, दहेगाव बंगला, शिरेसायगाव, लासूर स्टेशन परिसरातील काही गावांत पेरणीचा टक्‍का प्रचंड कमी आहे. जालना जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमीच आहे. त्यामुळे अनेक गावात अजून पेरणीच नाही. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. २५ जूनच्या आसपास पेरणी झालेल्या भागात येत्या तीन ते चार दिवसांत पाऊस येण्याची गरज आहे.

२८ जूनअखेर पेरणीची स्थिती मराठवाड्यात यंदाच्या खरिपात ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी प्रस्तावित आहे. त्या तुलनेत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ लाख ५३ हजार २५७ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी उरकली होती. प्रस्तावित क्षेत्राचा विचार करता पेरणी झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी होणे बाकी आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रात तृणधान्याची १ लाख ४८ हजार २३८ हेक्‍टरवर पेरणी झाली. तर कडधान्याची २ लाख ४५ हजार २७५ हेक्‍टरवर पेरणी झाली. ६ लाख ३८ हजार ७४८ हेक्‍टरवर कपाशीची  सोयाबीनची ६ लाख १४ हजार ३८४ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

एक एकर कपाशी पंधरवड्याखाली लावली होती. काही उगवली, काही नाही. जी उगवली ती जळून गेली. आता पावसाची वाट पाहतोय. आला की लावू, काय करावं. - अनिल वाल्ले, पांढरी ओहळ, ता. गंगापूर जि. औरंगाबाद.

पेरणी बंद केलीया. आधी दोन बॅगा टाकलो ते वाफलं नायं. सहा बॅगा सोयाबीन टाकलो त्यावर एक बारीक धडका आला. पंधरा दिसांपासून पाणी नाय. - त्र्यंबक कवाळे, हारेगाव, ता. औसा, जि. लातूर.

भयानक स्थिती आहे. पेरणीच नाही, बियाणं खतं आणून ठेवलं पण पाणी नाही. वैरणीचा प्रश्न आहे. आठ दहा दिवस पुरलं एवढाचा चारा शिल्लक आहे. - प्रभाकर अंभोरे, सिपोरा अंभोरे, ता. जाफ्राबाद, जि. जालना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com