वादळी पाऊस, गारपिटीचा फळबागा, रब्बीला तडाखा

झाकून ठेवलेल्या शेतीमालावर गारांचा असा थर साचला होता व मालाच्या खालून पाणी वाहत होते.
झाकून ठेवलेल्या शेतीमालावर गारांचा असा थर साचला होता व मालाच्या खालून पाणी वाहत होते.

पुणे ः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात शनिवारी दुपारनंतर वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे, गारा, मेघर्जनेसह आलेल्या पावसाने गहू, कांदा, मका, भाजीपाल्यासह पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, द्राक्ष या फळबागांचे नुकसान झाले आहे. बराच वेळ गारा पडल्याने काही ठिकाणी गारांचा खच पडला होता. मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते. विजा पडल्याने जीवितहानीच्या घटनाही घडल्या आहेत. रविवारी (ता. ८) दुपारनंतर पुणे, सातारा, नगर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात दाट ढग गोळा झाले होते. पुण्यात हलक्या पावसाच्या सरी पडल्या, तर उर्वरित जिल्ह्यातही पावसाला सुरवात झाली होती. दरम्यान, शनिवारी (ता. ७) विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह मुसळधार वादळी पाऊस पडला, तर यवतमाळ, भंडारा जिल्ह्यातही पावसाच्या सरी पडल्या. या पावसामुळे कलिंगड, खरबूज, संत्रा या फळपिकांसह भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान कायम असून, शनिवारी सायंकाळी वादळी वारे, धुळीचे लोट, गारपीट अन्‌ पाऊस असे चित्र होते. हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, बीड, लातूर जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील मोप (ता. सेनगाव) येथे वीज कोसळून शेतकरी ग्यानदेव निवृत्ती बर्वे यांच्या मालकीचा बैल दगावला. केंद्रा बुद्रुक येथे गारांचा पाऊस झाला. सातारा जिल्ह्याच्या अनेक भागांत गारांसह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. माण तालुक्यातील काळचौंडीतील अंगणात उभे असलेल्या दोन तरुणांवर वीज कोसळली. त्यात भागवत अनिल सावंत (वय १८) मृत्युमुखी पडले, तर त्यांच्याबरोबर असलेले अमोल आबासो सावंत (वय १९) हे जखमी झाले. नागठाणे, खटाव तालुक्यात विखळे येथे गारांचा पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस पडला. रब्बी हंगामातील काढणीला आलेला गहू, रब्बी ज्वारी, तसेच आंब्याचे नुकसान झाले आहे. मात्र उन्हाळी पिके, उसाला पाऊस लाभदायक आहे.  पुणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून असलेल्या उकाड्यानंतर दुपारी गारपिटीसह वादळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारे आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, भाजीपाला, पेरू, सीताफळ, आंबा, डाळिंब, केळी, चिंच, मका या पिकांचे नुकसान झाले. रविवारी दुपारनंतर विविध भागांत ढगाळ हवामान होते. उकाड्यातही चांगलीच वाढ झाली होती. शहरात हलक्या पावसाने हजेरी लावली. नगर जिल्ह्यातील पारनेर, अकोले, कर्जत तालुक्‍यात झालेल्या पावसाने कांदा, भाजीपाला, आंबा, कलिंगडे आणि काढणीला आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. कर्जत तालुक्‍यात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे गारपीट झाली. गारपिटीमुळे कांदा, भाजीपाला, आंबा, गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील सायखेडा- चांदोरी परिसरात पावसाच्या सरी कोसळल्याने द्राक्षे, कांदा उत्पादकांची तारांबळ उडाली. 

वादळी पावसाचे सावट कायम राजस्थानपासून आसामपर्यंत असलेला कमी दाबाचा पट्टा, पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळे देशभरात पावसाला पोषक हवामान आहे. तर अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरावरून होणाऱ्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे विविध भागांत वादळी पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातही विजा, जोरदार वारे, गारांसह पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. गुरुवारपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कोकणासह काही ठिकाणी हवामान मुख्यतः कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com