राज्यात साेमवारपर्यंत पूर्वमोसमीच्या सरी

राज्यात साेमवारपर्यंत पूर्वमोसमीच्या सरी
राज्यात साेमवारपर्यंत पूर्वमोसमीच्या सरी

पुणे : पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने सोमवारपर्यंत (ता. १४) राज्यात सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता असून, दक्षिण मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला अाहे. तर विदर्भात आलेली उष्णतेची लाट कायम राहणार असून, रविवारी (ता. १३) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.      वायव्य राजस्थानपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत असलेला हवेच्या कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रावरून होत असलेला बाष्पाचा पुरवठा यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. तर अरबी समुद्राच्या अाग्नेय भागात २.१ किलोमीटर उंचीवर च्रकाकार वारे वाहत असून, त्यांच्या प्रभावामुळे मंगळवारी (ता. १५) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यात उन्हाचा वाढलेला चटका कायम असून, विदर्भात उन्हाची तीव्रता अधिक आहे. विदर्भातील अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, मध्य महाराष्ट्रातील जळगाव मराठवाड्यातील परभणी येथे तापमानाचा पारा ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.  शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३९.४१, जळगाव ४५.०, कोल्हापूर ३६.३, महाबळेश्वर ३२.८, मालेगाव ४३.२, नाशिक ३८.८, सांगली ३६.२, सातारा ३९.६, सोलापूर ४२.५, मुंबई ३४.६, अलिबाग ३५.८, रत्नागिरी ३५.५, डहाणू ३५.३, औरंगाबाद ४२.०, परभणी ४५.५, अकोला ४४.०, अमरावती ४५.६, बुलडाणा ४४.०, ब्रह्मपुरी ४६.७, चंद्रपूर ४७.३, गोंदिया ४३.२, नागपूर ४४.५, वर्धा ४५.५, यवतमाळ ४५.०. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची हजेरी शनिवारी सकाळपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. मराठवाडा, विदर्भातही काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामान होते. औरंगाबाद जिल्ह्यातही तुरळक पावसाचा शिडकावा झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे मुसळधार पाऊस पडला. कोकणातील पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंबा पिकांवर परिणाम होण्याची भीती आहे.  उत्तर भारतात आज वादळाची शक्‍यता उत्तर भारतातील उत्तराखंड, जम्मू-काश्‍मीर आणि हिमाचल प्रदेश या राज्यांत उद्या (रविवारी) वादळ येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आज वर्तवली. राजस्थानच्या काही भागांतही पुढील दोन दिवसांत धुळीचे वादळ येवू शकते, असेही सांगण्यात आले. पूर्व उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपूर, मिझोराम, पश्‍चिम बंगालचा काही भाग, ओडिशा आणि झारखंडमध्ये 50 ते 70 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्‍यता आहे. त्याचवेळी पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, पश्‍चिम उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग, दक्षिण कर्नाटक, तमिळनाडू, पुद्दुचेरी, लक्षद्विप आणि केरळमध्येही वादळाची शक्‍यता आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये आलेल्या वादळामुळे 120पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com