सांगली ः जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला पाऊस हा हळद पिकासाठी उपयुक्त ठरतो आहे. यामुळे हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
जिल्ह्यात सुमारे एक हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी हळदीची उशिरा लागवड केली. जिल्ह्यातील वाळवा, मिरज, कडेगाव काही प्रमाणात कवठेमहांकाळ तालुक्यात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र, वाढीच्या दरम्यान, पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. उपलब्ध पाण्यावर हळद पीक बहरले होते.
पाण्याची कमतरता असल्याने उत्पादनात घट निश्चित होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी झालेला पाऊस हळद पिकाची वाढीसाठी उपयोगी ठरत आहे. हळदीचा फुटवादेखील वाढण्यास मदत होऊ लागली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पाण्याचे योग्य नियोजन होऊ लागले आहे. हळदीच्या उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.