राज्यात सप्टेंबरअखेर ८१ टक्के पावसाची नोंद

मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला.
पाऊस
पाऊस

पुणे ः राज्यात  जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ११४० मिलिमीटरपैकी ९२९.४ मिलिमीटर म्हणजेच ८१.५ टक्के पाऊस झाला असून वीस जिल्ह्यांत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. सर्वात कमी पाऊस यवतमाळ जिल्ह्यात ४८.३ टक्के झाला.  यंदा कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला असला तरी, मराठवाडा आणि विदर्भात दडी मारल्याचे चित्र अनुभवास मिळाले. त्यामुळे सोयाबीन, मूग, उडिद पिकांचे नुकसान झाले. परंतु, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. पावसाच्या खंडामुळे शेतकरी त्रस्त जूनच्या शेवटच्या आठवड्यात अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारल्याने शेतकरी चांगलेच त्रस्त झाले. मात्र, तेरा जुलैपासून माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला. वीस जुलैनंतर पुन्हा पाऊस गायब झाला. या कालावधीत मराठवाडा व विदर्भ वगळता कोकण व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. १९ आॅगस्टनंतर अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्येही अनेक भागात जोरादार पाऊस पडला.  कोकणात १०७ टक्के पाऊस  गेल्या चार महिन्यांत कोकणात दोन हजार ९७५ मिलिमीटर पैकी तीन हजार १९४ मिलिमीटर म्हणजेच सरासरी १०७ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात ११९.४ टक्के, जुलैमध्ये ९४. १ टक्के, आॅगस्टमध्ये १०१.७ टक्के तर सप्टेंबरमध्ये १३५.१ टक्के पाऊस झाला. यंदा शेतकऱ्यांना भात लागवडी वेळेवर करता आल्याने वाढही चांगली झाली. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा अधिक तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला.  मध्य महाराष्ट्रातही ८९ टक्के पाऊस   मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, नगर आणि नाशिकच्या अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, सोलापूर, नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्याच्या काही भागात पावसाने दडी मारल्याचेच चित्र होते. नाशिक विभागात सरासरी ७१७.४ मिलिमीटरपैकी ६४५.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरी ८९.९ टक्के तर पुणे विभागात ८८३.३ मिलिमीटरपैकी ७८७.४ मिलिमीटर म्हणजेच ८९.१ टक्के पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यात सर्वाधिक शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर या जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला. तर कोल्हापूर जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाल्याचे दिसून येते. 

मराठवाड्यात ८० टक्के पाऊस  मराठवाड्यात सरासरी ७२८.८ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ७८७.४ मिलिमीटर म्हणजेच ८९.१ टक्के पाऊस पडला. जूनमध्ये ११७.६ टक्के, जुलैमध्ये ३६.७ टक्के, आॅगस्टमध्ये १०७.५ टक्के, तर सप्टेबरमध्ये ७४.१ टक्के पाऊस पडला. गेल्या चार महिन्यांत उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शंभर टक्केहून अधिक पाऊस पडला आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर जिल्ह्यामध्ये ७५ टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला. तर नांदेड, हिंगोली व परभणीमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक पाऊस पडला.

विदर्भात अवघा ६४ टक्के पाऊस विदर्भातील नागपूर व बुलढाणा जिल्ह्यात ७५ टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये ५० टक्केपेक्षा कमी पाऊस झाला. एक जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत अमरावती विभागात सरासरी ७९७.७ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा ५१२.३ मिलिमीटर म्हणजेच ६४.२ टक्के पाऊस पडला. नागपूर विभागात ११६८.६ मिलिमीटर पाऊस पडतो. चालू वर्षी ७४८.१ मिलिमीटर  म्हणजेच ६४.० टक्के पाऊस पडला आहे. एकंदरीत चार महिन्यांचा विचार केल्यास जूनमध्ये विदर्भात सर्वाधिक पाऊस पडल्याचे दिसून येते.  विभागनिहाय झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) 

विभाग   जून जुलै आॅगस्ट सप्टेंबर
कोकण ७८८.४ १०९६.१ ७६९.८ ५१२.४
नाशिक १३८.४ २१९.६  १६३.८  १२३.२
पुणे १६७.९  २६६.७  १३६.७  २०५.४
औरंगाबाद १७१.५ ७३.८ २१२.०   १३१.०
अमरावती १३८.१ १४७.१ १२४.७ १०२.३ 
नागपूर ११८.५ २७४.४ २२७.२   १२५.८
एकूण २१९.१ २८८.९ २३५.२ १८०.३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com