रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'

रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला स्वतंत्र 'जीआय'

मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या मार्गावर असून, लवकरच हापूस ‘कोकण’चाच यावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत मिळाले आहेत. कोकणच्या हापूसबरोबरच देवगड, रत्नागिरी, अलिबाग यांना स्वतंत्र अस्तित्वही सरकारी पातळीवर मान्य होणार असल्याने बागायतदारांच्या दृष्टीने ही आनंदाची वार्ता असणार आहे.

भौगोलिक निर्देशांक (जीआय) विषयातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी या संदर्भात माहिती दिली. देशात प्रामुख्याने चार राज्यांत हापूसचे उत्पादन घेतले जाते. यामुळे कोकणचा मूळ निवासी असलेल्या हापूसला स्वतंत्र ओळख मिळत नव्हती. परिणामी देवगड, रत्नागिरी, अलिबाग येथील आंबा बागायतदारांना हापूसच्या भौगोलिक दर्जाचा आर्थिक लाभ घेता येत नव्हता. सर्वच राज्यांतील हापूस एकच अशी कृषी विद्यापीठाची भूमिका यास मारक ठरत असल्याने गेल्याकाही वर्षांपासून हा लढा सरकार दरबारी सुरू होता. अखेर सरकार दरबारी याबाबत गुरुवारी (ता. १९) झालेल्या सुनावणीत हापूस कोकणचाच या विषयावर एकमत होण्यास व तत्त्वतः मंजुरी मिळविण्यात यश आल्याचे प्रा. हिंगमिरे यांनी सांगितले. 

कोकणच्या हापूसला बल्साड, धारवाड हापूसशी स्पर्धा असते. मात्र, स्वाद आणि गंध यांच्या भौगोलिक गुणधर्मामुळे महाराष्ट्रातील कोकणपट्ट्यात देवगड, रत्नागिरी आणि अलिबाग हापूसचा स्वतंत्र दर्जा आणि वैशिष्ट्ये असल्याने शेतकऱ्यांना अधिक दराचा लाभ मिळत असतो. परंतु, चार राज्यांत पिकणारा हापूस हा एकच असल्याच्या कृषी विद्यापीठाच्या भूमिकेमुळे यास देशात अाणि परदेशात बाजारपेठेत अधिकचा लाभ मिळविण्यात अडचणीत येत होत्या. भौगोलिक निर्देशांकाकरिता (जीआय) दाखल दाव्यांनासुद्धा अडचणी निर्माण होत होत्या, अखेर यावर दर्जा, चव आणि गंध यासह इतर मूळस्थान आदी वैशिष्ट्यांचा लाभ ‘कोकण हापूस’ला देण्याचे संकेत मिळाले आहेत. परिणामी कोकणातील हापूस परदेशात अधिकृतरीत्या स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास यशस्वी ठरेल असे दिसते. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’ कार्यालयाकडून येत्या २७ एप्रिलला याबाबत अधिकृत निर्णय जाहीर होण्याचे संकेत प्रा. हिंगमिरे यांनी दिले आहेत.  

देवगड, रत्नागिरी हापूसच्या नावावर शिक्कामोर्तब  आपल्या मातीतील अस्सल स्वाद आणि गंध असलेल्या हापूस आंब्याला ‘जीआय’ मिळावा यासाठी कोकणातील आंबा बागायतदार सुमारे साडेचार- पाच वर्षांपासून झगडत होते. त्यानुसार ‘जिआॅग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्री’कडून मागील वर्षी देवगड आणि रत्नागिरी हापूस असे स्वतंत्र ‘जीआय’ देण्यात आले. त्यानंतर या निर्णयावर आक्षेप नोंदवण्यासाठी साडेचार महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये देवगड व रत्नागिरी असे स्वतंत्र प्रकार न करता हापूस सरसकट कोकणचा याप्रकारचे ‘जीआय’ मिळावे असा एक आक्षेप नोंदवण्यात आला. मात्र दोन्ही भागांतील भौगौलिकता, जमीन, हवामान, लागवड इतिहास आदी बाबी तपासून पाहता त्यांना स्वतंत्रपणे ‘जीआय’ देण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com