नगर ः ज्या ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत, त्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासह मनुष्यबळाची अडचणी भासू नये, यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनमधून देण्यात आली. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जिल्हाभरातील १३४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार शेतकरी केंद्रावर आल्यानंतर खरेदी सुरू होणार आहे.
जिल्ह्यामध्ये गतवर्षी तूर खरेदीचा प्रश्न गंभीर झाला होता. केवळ कृषी विभागाने तूर उत्पादनाचा योग्य अहवाल दिला नसल्याने ऐनवेळी तुरखरेदीचा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यामुळे यंदा कृषी विभागाने सावध पवित्रा घेतला. शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यामध्ये पाच हजार ४५० रुपये क्विंटलने नाफेडने सुरू केलेल्या खरेदी केंद्रांवर तुरीची खरेदी सुरू आहे.
सध्या जिल्ह्यात नगर, जामखेड, नेवासा, पारनेर, वांबोरी (राहुरी), शेवगाव, श्रीरामपूर, मिरजगाव, श्रीगोंदा या नऊ ठिकाणी तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत. तुरीसोबत हरभरा खरेदीचाही प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे हरभरा खरेदीसाठी केंद्र सुरू करण्याची मागणी केली जाऊ लागली. त्यामुळे आता हरभरा खरेदी केंद्रही सुरू केली जात आहेत. ज्या ठिकाणी याआधी तूर खरेदी केंद्र सुरू आहे, त्याच ठिकाणी हरभरा खरेदी केंद्रही सुरू होणार आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच खरेदी केंद्रावर मनुष्यबळ कमी पडू नये यासाठी मार्केटिंग फेडरेशनने हा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे जिल्ह्यामध्ये नऊ ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र सुरू होणार आहेत. हरभरा विक्रीसाठी आतापर्यंत जिल्हाभरातील १३४८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीनुसार शेतकरी केंद्रावर आल्यानंतर खरेदी सुरू होणार आहे, असे मार्केटिंग फेडरेशनमधून सांगण्यात आले.