अकोला : दिवसेंदिवस वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त होत असून हे प्राणी पिकांची अतोनात नासाडी करीत असतात. वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे ज्वारी, मक्यासारखी पिके हद्दपार होण्याची स्थिती तयार होत आहे. याला पायबंद घालण्यासाठी शेताला कुंपण अावश्यक असून यासाठी शासनाने १५ वर्षे मुदतीचे कर्ज धोरण अाखावे, अशी मागणी विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे केली.
श्री. फुंडकर यांच्या निवासस्थानी मूर्तिजापूर येथील प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे, जनमंच(नागपूर)चे मूर्तिजापूर अध्यक्ष प्रा. सुधाकर गौरखेडे, प्रगती शेतकरी मंडळाचे नितीन गावंडे, योगेश वानखडे, गोपाल तायडे, देविदास बांगड, अरुण बोंडे यांनी भेट घेत निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांनी ज्वारी, मका पेरणी बंद केली आहे. सध्या शेताला कुंपण करण्यासाठी सातवर्षे परतफेडीची दीर्घमुदत योजना बँकांमध्ये अस्तित्वात अाहे. त्यामुळे कर्ज फेडीचा हप्ता शेतकऱ्यांना जड जातो. घर बांधणीकरीता ३० वर्षे मुदतीची कर्जयोजना असून त्याच धर्तीवर शेत कुंपणांसाठी किमान १५ वर्षे मुदतीची योजना नाबार्ड व रिझर्व्ह बँकेशी चर्चा करून तयार करण्याची गरज अाहे. त्यावर अल्प व्याजदर कसे अाकारले जाईल यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात अाली.