दिवाळीच्या उत्साहावर परतीच्या पावसाचे पाणी

ढगाळ हवामानामुळे द्राक्षावर डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच परतीच्या पावसाने सगळी द्राक्षशेतीची संकटात आली. यामुळे यंदाचा हंगामच वाया गेल्याची स्थिती आहे. -विनायक माळी, कवठेमहांकाळ
पाऊस थांबल्याने शेतात वाफसा आल्याने दिवाळीतही शेतकऱ्यांची भाताची कापणी सुरू आहे
पाऊस थांबल्याने शेतात वाफसा आल्याने दिवाळीतही शेतकऱ्यांची भाताची कापणी सुरू आहे

कोल्हापूर : मॉन्सूनच्या पहिल्या टप्प्यात पाऊस हवा म्हणून आम्ही धावा केला आणि अखेरच्या टप्प्यात मात्र पाऊस थांबावा म्हणून वाट पहातोय. गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने खरिप भाताची काढणीच संकटात आलीय. नुकसान टाळण्यासाठी कच्या वाफशातच भाताची काढणी सुरू आहे. उत्पन्नात घट निश्‍चित आहे. या वातावरणात दिवाळीची खरेदी सुरू आहे, पण त्यात उत्साह नाही. डोळ्यासमोर पावसामुळ भात नुकसानीची शक्‍यता उदविग्न करत असल्याची प्रतिक्रिया कोथळी (ता. करवीर) येथील प्रगतिशील शेतकरी आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.  तसे पहायला गेले तर श्री. पाटील हे साडेसात एकरांचे प्रयोगशील शेतकरी. यामध्ये फळपिकासह ऊस, भात व मत्स्य शेतीही त्यांनी केली आहे. त्यांच्या वैविध्यपूर्ण पिकांमुळे त्यांना शेतीत फारसे नुकसान सोसावे लागत नाही. घरचा पुरता भात होतो. तो काढला की इतर पिके घेतली जातात. आताही भात काढणीच्या अवस्थेत आहे. पण भाताच्या शिवारातच जाणे अशक्‍य आहे. रोज पडणारा पाऊस उदविग्न करीत आहे. ज्या दिवाळीत रब्बीची धामधूम असायची त्याच दिवाळीत आता खरिपाच्या काढणीसाठी पाऊस थांबायचा धावा करावा लागत आहे. आनंदरावांची ऊस शेतीही आहे. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी आडसाली लावण केली आहे. पुरेसा सूर्यप्रकाश आहे. पण जमिनीतले पाणी हटायला तयार नाही. पाणी काढल्याशिवाय उसाची वाढ अशक्‍य आहे. आता हे पाणी काढायचे कसे व ऊस शेती जगवायची कशी याच चिंतेने प्रयोगशील असणाऱ्या आनंदरावांनीही चिंताग्रस्त केले.  श्री. पाटील हे गावातील संस्थेची संबंधित आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्र्यांशीही थेट संवाद साधला. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी किती चांगल्या प्रकारे कर्जमाफी होईल हे सांगितले. पण प्रत्यक्षात गावी मात्र मोठी विचित्र अवस्था असल्याचे त्यांचे मत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातच्या सोसायट्यांमध्ये बहुतांशी करून ऊस उत्पादकांचे कर्ज असते. पण कालावधीच्या बाबतीत गोंधळ असल्याने प्रत्यक्षात फक्त दहा ते पंधरा टक्के लोकांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्‍य नसल्याचे आनंदराव सांगतात. म्हणजे इतकी ढोलवाजवून प्रसिद्धी केली जात आहे त्याचा ऊस पट्ट्यातल्या शेतकऱ्याला किती लाभ होत असेल याचे चित्र आनंदरावाच्या बोलण्यातून लक्षात येते. एकूण परतीचा पावसाने उडविलेली दाणादाण, कर्जमाफीबाबतचे असमाधानकारक चित्र, खरिपाची चिंता या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्याची दिवाळी फारशी उत्साहवर्धक नसल्याचेच दृष्य आहे.  द्राक्षबागेच्या नुकसानीने हिरावला दिवाळीचा आनंद अलीकडच्या काळात सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्‍यात द्राक्ष शेती वाढत आहे. दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील विनायक माळी यांचाही आनंद ऐन दिवाळीच्या अगोदर पावसाने हिरावून घेतला. सप्टेंबरला छाटणी झाल्यानंतर यंदाचा हंगाम साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्री. माळी यांना पहिल्यांदा ढगाळ हवामानाचा फटका बसला. यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव झाला. यातून सावरण्याचा प्रयत्न करीत असतानाच परतीच्या पावसाने सगळी द्राक्षशेतीची संकटात आली. यामुळे यंदाचा हंगामच वाया गेल्याची स्थिती आहे. बहुतांशी द्राक्षबागात पाणी साचल्याने नुकसान अटळ बनले आहे. यामुळे बागायतदारांच्या उत्साहवर पाणी परसले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com