नगर जिल्हा विभाजनाला महसूलमंत्रीही सकारात्मक

नगर जिल्हा
नगर जिल्हा

नगर ः निवडणुकीपूर्वी नगर जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचे वक्तव्य करून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी राजकीय राळ उठवून दिली होती. त्यात आता ‘नगर जिल्हा विभाजनासंबंधीचा अहवाल आला आहे, अहवाल पाहून जिल्हा आणि आवश्‍यक तेथे तालुका विभाजनाबाबत लोकभावनेवर निर्णय घेणार आहे’, असे सांगून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा विभाजनाच्या चर्चेत भर घातली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोडांवर जिल्हा विभाजनाचा विषय पुढे आल्याने लोकभावनेसोबत राजकीय निर्णय असल्याचीही चर्चा सुरू आहे. राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील विविध कार्यक्रमासाठी शनिवारी नगरमध्ये होते. नगर जिल्ह्यामध्ये सध्या जिल्हा विभाजनाचा विषय चर्चेत आहे. चार दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कोपरगाव तालुक्‍यातील एका कार्यक्रमात जिल्हा विभाजन करणार असल्याचे सांगितले होते. त्यावरूनच जोरदार चर्चा सुरू झाली असताना पुन्हा महसूलमंत्री पाटील यांनी जिल्हा विभाजनाचे समर्थन करत त्यात भर घातली. पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, तालुका आणि जिल्हा विभाजनाचा अहवाल प्राप्त झालेला आहे. त्या अहवालानुसार विभाजनाचा निर्णय शासन घेणार आहे. ‘निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा विभाजनाचा विषय नाही. जिल्हा विभाजनाची खूप जुनी मागणी आहे. आम्ही सत्तेवर आल्यावरच तालुका आणि जिल्हा विभाजनासाठी समिती नियुक्त केली होती. केवळ नगर जिल्ह्याचाच विभाजनाचा विषय नाही तर राज्यातील इतर मोठ्या जिल्ह्यांचा विभाजनाचा विचार आहे. तालुका आणि जिल्ह्यांचा विभाजनाचा अहवाल प्राप्त झाला असून अहवालानुसार योग्य निर्णय सरकार घेईल. सरकारचा तालुका आणि जिल्हा विकेंद्रीकरणाचा विचार आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍याचं आष्टा उपकेंद्र केलंय, तर जत तालुक्‍याचं आणि चंद्रपूर जिल्ह्यातही उपकेंद्र केले आहेत. जिल्हा विभाजन ही विकासाची गरज असून ठाणे जिल्हा विभाजनाचा ठाण्याला आणि पालघरला फायदा झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्यात जिल्हा विभाजनाची चर्चा सुरू आहे. मात्र जिल्हा विभाजन हे निवडणुका तोंडासमोर ठेवून नाही तर लोकभावनेवर आम्ही निर्णय घेणार आहोत. पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या पाठोपाठ महसूलमंत्री प्रा. चंद्रकांत पाटील यांनीही जिल्हा विभाजनाबाबत सकारात्मकता दर्शवली असल्यामुळे ‘आता जिल्हा नक्की होणार’ अशी चर्चा सुरू झाली आहे. तालुका विभाजनाची मागणी वाढली नगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर किंवा शिर्डी यापैकी एक नव्या जिल्ह्याचे मुख्यालय असेल असेही आता लोकांना वाटू लागले आहे. जिल्हा विभाजनासोबत अकोलेमधील राजूर, शेवगावमधील बोधेगाव, पाथर्डीतील तीसगाव, पारनेरमधील सुपा, यासह अन्य मोठ्या गावांला तालुक्‍याचा दर्जा देण्याचीही मागणी पुढे येऊ लागली आहे. मंत्रालयातील अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विभाजन व तालुका विभाजन अशा दोन समित्या केल्या होत्या. त्या समित्यांनी अहवाल सादर केले आहेत. अहवालात काय आहे हे सांगितले जात नसले तरी अहवाल सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com