पालघर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान

पालघर जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान
पालघर जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान

वाडा, जि. पालघर  : तालुक्‍यात दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने हळव्या भाताच्या पिकाला तडाखा बसला आहे. कापणीसाठी तयार झालेल्या आणि काही जणांनी कापणी करून सुकवण्यासाठी शेतात ठेवलेल्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी हळव्या भाताचे पीक घेतात. हे पीक आठ दिवसांपूर्वीच कापणीयोग्य झाले. काही शेतकऱ्यांनी कापणी सुरूही केली; परंतु पावसाने दोन दिवस कहर केल्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी कापणी केलेले पीक वाहून गेले, तर अनेक ठिकाणी तयार पीक शेतातच आडवे झाले. हाती आलेले पीक पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेताचे बांध वाहून गेले आहेत. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष पांडुरंग पटारे यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

विक्रमगड, जि. पालघर : पावसाचा जोर कायम राहिल्यास तयार झालेले भाताचे पीक कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.  विक्रमगड परिसरात संततधार सुरू असल्याने भात आणि अन्य पिके अडचणीत आली आहेत.

हळव्या भाताचे पीक कापणीला आले असून गरवे पीकही तयार होण्याचा स्थितीत आहे. शेतकरी दसऱ्याच्या मुहूर्तावर कापणी सुरू करतात. पाऊस थांबत नसल्याने शेतात पाणी साचून पीक कुजण्याचा धोका निर्माण झाल्याने चिंताग्रस्त झाले आहेत. खुडेद, बोरसेपाडा, ओंदे, शिल, झडपोली भागांत शेताचे बांध पावसामुळे वाहून गेले. पावसाच्या लहरीपणामुळे भातशेती करणे जिकिरीचे होत चालले आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास भातशेतीचे क्षेत्र कमी होण्याची शक्‍यता आहे, असे मत शेतकरी कैलास तुंबडा यांनी व्यक्त केले.

डहाणू  : डहाणू तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भातशेती, मिरची आणि केळी बागायती उद्‌ध्वस्त झाली आहे. सरकारने नुकसानीची तातडीने पाहणी करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. डहाणू परिसरात मंगळवारी (ता. १९) रात्री मुसळधार पाऊस, वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेती आणि बागायतीचे मोठे नुकसान झाले.

बावडा येथील बबन चुरी यांची केळीची बाग, फुलांची लागवड, शेड आणि सुरेंद्र पाटील यांची भातशेती व केळीची बाग उद्‌ध्वस्त झाली. वाणगाव परिसरात मिरची लागवडीसाठी शेतकऱ्यांनी उभारलेली शेडनेट फाटून गेल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. भातपीक भुईसपाट झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com