उत्पन्न वाढण्यात कृषी शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची : राष्ट्रपती

कानपूर ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येथे शेती आणि हवामान परिषदेचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्यांनी येथील ॲग्रीएक्स्पोला भेट दिली.
कानपूर ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते येथे शेती आणि हवामान परिषदेचे उद्‌घाटन झाले. या वेळी त्यांनी येथील ॲग्रीएक्स्पोला भेट दिली.

कानपूर : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र शेती क्षेत्रातील शास्त्रज्ञांच्या सहभागाशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित शेती आणि हवामान बदल'' परिषदेत राष्ट्रपती कोविंद बोलत होते. राष्ट्रपती कोविंद पुढे म्हणाले, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुपटीने वाढविण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शेतीत आधुनिक बदल तसेच ''पर ड्रॉप मोर क्रॉप'' असे ध्येयधोरणे समोर ठेऊन प्रयोग करावे लागणार असून, कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.

राष्ट्रपती म्हणाले, शेतकरी जोडधंद्याच्या साह्याने आपले उत्पन्न वाढवू शकतात. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती व्यतिरिक्त कुकुटपालन, शेळीपालन आणि दुग्ध व्यावसाय करावेत. शेतीमालाला चांगला दर मिळवून देण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी पणनमध्ये सुधारणा आणि अन्नप्रक्रिया उद्योगांची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगले दर मिळतील, असेही राष्ट्रपती कोविंद यांनी नमूद केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांना अन्नप्रक्रिया उद्योगाशी संलग्न करण्यासंदर्भात बोलताना राष्ट्रपती म्हणाले, की देशातील ६० टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्याच्या स्थितीला देशातील १३ राज्य दरवर्षी दुष्काळी समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे शेतीसाठी पाण्याचे नियोजन, तसेच सुयोग्य वापर करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना जागरूक करण्याची आवश्‍यकता आहे.  

कर्नाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना राष्ट्रपती कोविंद म्हणाले, कर्नाल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचऱ्यापासून सेंद्रिय खते तयार करण्याचे तंत्र विकसित केले आहे. या व्यतिरिक्त झारखंड आणि ओरिसामधील शेतकऱ्यांनी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे विकसित केलेल्या आंब्याच्या आम्रपाली आणि मल्लिका या संकरित वाणांची लागवड केली आहे.

जय जवान जय किसान घोषवाक्य ठरतेय उपयुक्त माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिलेला ''जय जवान जय किसान'' नारा सध्याच्या काळात अधिक उपयुक्त ठरत असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. तसेच शेती क्षेत्राच्या विकासासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी ''शेती आणि हवामान बदल'' परिषदेला नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पल्स रिसर्च,  सोसायटी फॉर ॲग्रिकल्चर प्रोफेशनल ॲँड इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च येथे एकत्र आले, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती कोविंद यांनी काढले. या परिषदेला जपान, नेपाल आणि भूतान या देशांतील १५ कृषी शास्त्रज्ञांसह ६०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com