लोकसहभागातून ग्रामविकास अभियान : सहकारमंत्री सुभाष देशमुख

लोकसहभागातून ग्रामविकास अभियान : सहकारमंत्री सुभाष देशमुख
लोकसहभागातून ग्रामविकास अभियान : सहकारमंत्री सुभाष देशमुख

सोलापूर  : सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील गावागावांमध्ये लोकसहभागातून विकासाची चळवळ सुरू व्हावी, गावागावांमध्ये सकारात्मक स्पर्धा व्हावी, यासाठी सरपंच आणि लोकांच्या सहभागातून सर्वंकष असे ग्रामविकास अभियान राबविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शनिवारी (ता. १५) दिली. 

या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गावांसाठी कोणत्या प्रकारचे उपक्रम असावेत, त्याचे निकष काय असावेत, गावस्तरावर काम करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांची मते जाणून घेण्यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील निवडक ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. 

मंत्री देशमुख म्हणाले, ‘‘प्रत्येकाने आपापल्या गावासाठी काम करावे. आपल्या गावातील पायाभूत मूलभूत सुविधा, पाणी, स्वच्छता, पर्यावरण, तीर्थक्षेत्र, मंदिर ऐतिहासिक वारसा असलेली ठिकाणे यांचा विकास, शाळा -शिक्षण, कृषी व कृषी आधारित उद्योग व्यवसाय, इतर रोजगारनिर्मिती, प्रक्रिया उद्योग विषमुक्त शेती प्रयोगशील शेती, रोजगारनिर्मिती, प्रशासनात लोकसहभाग, महिला सक्षमीकरण, महिला बचत गट, उत्पादक यांच्या उत्पादनाचे मार्केटिंग इत्यादी विषयांमध्ये काम करणाऱ्या गावांसाठी ही स्पर्धा असेल. त्यातूनच उत्कृष्ट गावे निवडली जातील.’’ 

या स्पर्धेत स्वतःहून ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा आणि अधिकाधिक गावे त्यात सहभाग घेतील, अशी अपेक्षा उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचला पाटील यांनी व्यक्त केली. या स्पर्धेसाठी जिल्हा परिषद पूर्णतः सहकार्य करेल, असेही त्यांनी नमूद दिले. सेंद्रिय शेतीचे अभ्यासक, पोलिस निरीक्षक नाना कदम यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्याचे फायदे, या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असणारे तंत्रज्ञान आणि त्याकरिता उपलब्ध असणारे मनुष्यबळ गावांच्या सहकार्यासाठी उपलब्ध असल्याचे नमूद केले.  

या उपक्रमासाठी फाउंडेशनच्या संचालिका पूर्वा वाघमारे, अभिजीत पाटील, सल्लागार प्रा. नरेंद्र काटीकर प्रा. देवानंद चिलवंत, शिवाजी पवार यांची समिती कार्यरत केली आहे, असे सांगण्यात आले. पाकणीच्या सरपंच शोभा गुंड, कारंब्याच्या सरपंच कौशल्या सुतार, कलकर्जाळचे सरपंच विवेक ईश्वरकट्टी, सुर्डीच्या सरपंच सुजाता डोईफोडे, बाळगीच्या सरपंच सुमित्रा कासे, अर्जुनसोंडच्या सरपंच सुषमा हावळे, गौडगावचे सरपंच वीरभद्र सलगे, मनगोळीचे सरपंच समाधान घंटे उपस्थित होते. मुख्य समन्वयक दत्तात्रय चौगुले यांनी फाउंडेशनच्या वतीने उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com