सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे पीककर्ज वाटप

सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे पीककर्ज वाटप
सांगली जिल्हा बॅंकेकडून २९८ कोटींचे पीककर्ज वाटप

सांगली : खरीप हंगामाची तयारी सुरू झाली असताना राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून पीककर्ज देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून खरिपासाठी आतापर्यंत ४४ हजार २५६ शेतकऱ्यांना २९८ कोटी ६१ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. हे कर्ज कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान आणि एकरकमी परतफेड या योजनेमार्फत दिले आहे. मात्र, अद्यापही शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.  जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध होत नाही. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यासाठी टाळाटाळ होऊ लागली आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. सध्या जिल्हाभर पेरणीची पूर्वतयारी करण्यात येत आहे. काही भागांत अत्यल्प पेरणी झाली आहे. मात्र, पेरणीअगोदर पीककर्ज देणे बॅंकांना बंधनकारक आहे. मात्र, कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याने कर्ज देण्यासाठी विलंब होत असल्याचे दिसते आहे. असे असताना जिल्हा बॅंकेने कर्जपुरवठा करण्यात अग्रेसर आहे. जिल्हा बॅंकेने सुमारे ५० टक्केहून अधिक कर्जाचे वाटप केले आहे.  जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आत्तापर्यंत ४४ हजार २५६ शेतकऱ्यांना २९८ कोटी ६१ लाख ६६ हजार रुपयांचे अल्प मुदतीचे १५ जूनपर्यंत कर्ज वाटप करण्यात आले आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेमध्ये कर्जमाफी मिळालेल्या २०३८ शेतकऱ्यांना ९ कोटी ९४ लाख ६६ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. नियमित कर्जाची परतफेड करून प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेतलेल्या ४१ हजार ३२१ शेतकऱ्यांना २८४ कोटी १३ लाख ९२ हजार रुपये, तर ओटीएस योजनेमध्ये ५०९ शेतकऱ्यांनी दीड लाखांवरील कर्जाची रक्कम भरून कर्जमाफी मिळविली होती, त्या शेतकऱ्यांना २ कोटी ४८ लाख ६७ हजार रुपये पीककर्ज देण्यात आले. कर्जमाफी योजनेव्यतिरिक्त ३८८ शेतकऱ्यांना २ कोटी चार लाख ४१ हजार रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. बॅंकेकडे अद्यापही पीककर्जाचे प्रस्ताव सादर केले जात आहेत, त्याची पडताळणी करून पीककर्ज दिले जात आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बॅंका कर्जपुरवठा करण्यासाठी अद्यापही पुढे आलेल्या दिसत नाहीत. शेतकरी राष्ट्रीयीकृत बॅंकेत कर्जासाठी हेलपाटे मारत आहेत. बॅंक ऑफ इंडियाने २१, बॅंक ऑफ महाराष्ट्रने १८, सेंट्रल बॅंकेने ५, आयडीबीआय बॅंकेने ३२ तर आयसीआयसीआय बॅंकेने ११ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. मात्र, ही टक्केवारी फारच कमी आहे. कर्जवाटप करण्यासाठी राष्ट्रीयकृत बॅंका विलंब करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आमच्या भागात स्टेट बॅंकेची शाखा आहे. त्या बॅंकेत कोणतीही माहिती व्यवस्थित मिळत नाहीत. यंत्रणादेखील नीट नाही. त्यामुळे कर्ज मिळणे कठीण झाले आहे. मुळात माझे कर्जमाफीचे प्रोत्साहन अनुदानदेखील अद्यापही मिळालेले नाही. - रवींद्र सूर्यवंशी, सूर्यगाव, ता. पलूस.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com