अकोला : प्रशासनाने या हंगामासाठी काढलेली नजरअंदाज पैसेवारी टीकेची धनी बनली अाहे. संपूर्ण वऱ्हाडात कमी पावसामुळे पिकांची उत्पादकता घसरलेली असताना अकोला, बुलडाणा अाणि वाशीम जिल्ह्यांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक काढण्यात अाली अाहे. प्रशासनाकडून २०१७-१८ मधील खरीप हंगामाकरिता तीनही जिल्ह्यांची नजरअंदाज (हंगामी) पैसेवारी जाहीर करण्यात अाली अाहे.
वाशीम जिल्ह्यातील प्रमुख पिकांची सरासरी पैसेवारी ५८ पैसे इतकी निघाली अाहे. यात वाशीम तालुक्यातील १३१ गावांची नजरअंदाज पैसेवारी ५५ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची ६० पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची ६८ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची ५८ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची ५५ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची ५४ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्वच ७९३ महसुली गावांची नजर अंदाज पैसेवारी ही ५० पैशांपेक्षा अधिक निघाली अाहे.
अकोला जिल्ह्याची स्थितीसुद्धा अशीच बिकट अाहे. सरासरी ३० ते ३५ टक्के पाऊस कमी झालेला अाहे. मूग, उडीदाचे अतोनात नुकसान झाले अाहे. यावर्षी सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झालेला नाही. हे चित्र संपूर्ण जिल्ह्यात असताना जिल्हा प्रशासनाने ९९० गावांची नजरअंदाज पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे जाहीर केले. याचाच अर्थ जिल्ह्यात यंदा पाऊस नसला तरी दुष्काळ नसल्याचा निष्कर्ष निघत असल्याने शेतकरी व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत रोष वाढला अाहे.
प्रशासनाद्वारे जाहीर केलेल्या नजर अंदाज पैसेवारीनुसार १०११ गावांपैकी ९९० गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त दर्शविल्याने, प्रशासनाच्या निर्णयावर शेतकरी संघटनांकडून नाराजी तसेच आश्चर्य व्यक्त होत आहे.